Goa Gaude History Canva
गोवा

Goa History: पुरातन काळातील मुंडारींचा वारसा सांगणारी 'गावडा संस्कृती'

गोमन्तक डिजिटल टीम

गोविंद शिरोडकर

गावडा संस्कृती ही पुरातन काळातील मुंडारी संस्कृतीचा वारसा सांगणारी आहे. म्हणून मुडंकार कायद्याच्या नावात ‘मुंड’ शब्दाला प्रत्यय लावून मुडंकार असे लिहिले जाते. तो मुंड शब्द मुंडारी संस्कृतीमधला आहे. पूर्वी गावडा हा मुद्दार म्हणून गावड्याला हिणवायचे. कालांतराने मुद्दार ही व्याख्या असंस्कृतपणाच्या उद्धार करण्यासाठी लोक वापरू लागले. भारतातील आदिवासीची संस्कृती आर्य संस्कृतीपेक्षा आणि त्याच्या कर्मकांडांपेक्षा मानवतेच्या पायावर आधारित उज्ज्वल परंपरा घेऊन मार्गक्रमण करीत आहे.

आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांनी शुद्धीकरणाची प्रथा पुनर्धर्म प्रवेशासाठी ख्रिश्चन व मुस्लिमांसाठी वापरली. १८८० ते १८९० या कालखंडात त्याला चांगला प्रतिसाद लाभला. १८९०च्या कालखंडात त्यांनी बाकी प्रांतात विस्तार वाढवला.

परकीयांच्या गुलामगिरीतून भारत देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर पोर्तुगिजांच्या अत्याचारातून गोमंतभूमी मुक्त झाली. परंतु गावडा कुणबी, वेळीप या जमातींना मुक्त गोमंतकातील स्वातंत्र्याची चांगली फळे कधी चाखायला मिळाली का, या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’, असेच द्यावे लागेल. कारण आजही या मूलनिवासींना रस्त्यावर उतरल्याशिवाय त्यांचे घटनात्मक अधिकारही प्राप्त होत नाहीत.

ज्या लोकांना जमिनीच्या मातीच्या वासाची पारख नाही, जे हातात माती घ्यायला विटाळतात, असे लोक जमिनीचे मालक, भाटकार कसे होऊ शकतात? हे खरेच एक न उलगडणारे कोडे आहे.

मसुराश्रम या हिंदुत्ववादी मठाधीशाने आदिवासी गावड्यांना नवहिंदू करून घेण्याचे आपले ईप्सित साध्य केल्यानंतर त्यात वावरणार्या थोर समाजसुधारकांनी या जमातीच्या उत्कर्षासाठी काहीच केले नाही. नवहिंदू म्हणून गावड्यांना जन्म दिल्यानंतर या गावड्यांचे नीटपणे संगोपन करण्याऐवजी निर्दयी माणसे जशी नवजात अर्भकाला जशी अडगळीत फेकून देतात त्याप्रमाणे आदिवासींच्या एका गावडा गटाला त्यांनी बेवारशी केले.

मसुराश्रमाचे शुद्धीकरणाचे कार्य तडीस नेण्यासाठी गोमंतकातील हिंदू भाटकारांनी व इतर समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी फार मोठा पुढाकार घेतला होता. ज्यांच्या भाटात आपले वास्तव्य आहे तो भाटकारच जर का, ‘तू शुद्ध हो, तू हिंदू हो’, असा आदेश देऊन नवहिंदू व्हायला सांगत असेल तर मग बिचारा, अशिक्षित गावडा कसा विरोध करणार होता? त्यांचा त्या वेळेचा तो विरोध त्यांना पोर्तुगिजांप्रमाणेच अधिक जाचक ठरला नसता का?

कुणीही आम्हांला सवाल करेल की, पोर्तुगिजांच्या तावडीतून गावड्यांची सुटका करण्यासाठी व राष्ट्रवाद जागवण्यासाठी हिंदुत्व हा एकच पर्याय होता व त्यासाठी गावड्यांवर नवहिंदुत्व लादले तर त्यात काय वाईट घडले? या सवालाला आमचे एवढेच उत्तर की, मसुराश्रमाने शुद्धीकरणाच्या नावाने नवहिंदू नावाची एक नवीन जात, अवहेलनेची संस्कृती गावड्यांमध्ये गोमंतकात जन्माला घातली.

निरागस गावड्यांपाशी आदिम जमात संस्कृतीची जी मूल्ये होती ती फाडून त्यांच्या शरीरावर व आत्म्यावर ‘नवहिंदू’ हा शापित नवजातीचा नवशृंगार चढवायचा मसुराश्रमाला व तसेच भाटकारी समाजसुधारकांना काय अधिकार होता? त्यांनी वडाची साल काढून पिंपळाला का लावली? याचे उत्तर अजून आम्हांला सापडत नाही.

हरवलेल्या गाईच्या वासराला त्याच्या आईकडे म्हणजेच गाईकडेच सोडायचे असते; त्या वासराला जंगलात वाघ, सिंह, लांडगे यांच्याकडे सोडायचे नसते. परंतु पोर्तुगिजांची शिकार झालेल्या गावडा जमातीतील या वासरांना मसुराश्रमाने आणि गोमंतकातील उच्चभ्रू समाजाने नवहिंदुत्वाच्या एका नवजातीच्या जंगलात नेऊन सोडले. मसुराश्रमाने पांघरायला दिलेले नवजातीचे नवहिंदू हे वस्त्र गावडा जमातीच्या एकूण समृद्धीसाठी कसा शाप ठरला आहे याची प्रचिती कर्मठ हिंदुत्ववाद्यांना नाही येणार. परंतु एकूण गावडा वंश त्यामुळे आजपर्यंत एकमेकांपासून दुरावत चालला आहे. या विषवृक्षाच्या छायेत वावरताना एकाच रक्ताच्या या भावंडांची तोंडे आज विरुद्ध दिशेने आहेत.

आदिवासी गावड्यांना नवहिंदू करून घेतलेल्या मसुराश्रमाने गावड्यांकडून आपण हिंदू व आपले पूर्वजदेखील हिंदूच होते असे गावड्यांचा पूर्वेतिहास माहीत असूनदेखील खोटे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले. खरे म्हणजे हे सारे घटनाबाह्य तसेच मानवी हक्कांचे उल्लंघन करणारे कृत्य होते आणि हे सारे पोर्तुगिजांच्या कृत्याइतकेच निंदनीय आहे. शुद्धीकरण करताना गावड्यांचे आदिवासी म्हणूनच शुद्धीकरण केले असते तर कोणाचे काय बिघडले असते?

१९२८मध्ये पोर्तुगीज कालखंडात प्रतिज्ञापत्र स्वतः लिहून देण्याइतपत गावड्यांच्या नेते किंवा नवहिंदू झालेले गावडे साक्षर नव्हते. तशी प्रतिज्ञापत्रे लिहून देण्याइतपत गावडे साक्षर असते तर आज गावडा जमातीच्या घरोघरी लक्ष्मी व सरस्वती पाणी भरते, अशी समृद्ध स्थिती गावड्यांची झाली असती. गावड्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेताना मसुराश्रमाने गावडा जमातीच्या इतिहासाचा गळा तर घोटलाच आहे, त्याशिवाय अश्वत्थाम्याच्या जखमेसारखी कधीही न भरून येणारी जखम गावड्यांच्या कपाळावर वाहवत ठेवली आहे. निरक्षर गावड्यांकडून त्यांचा खरा इतिहास लपवून खोटी प्रतिज्ञापत्रे लिहून घेणे हा गावडा जमातीला दिलेला धोका नाही काय? हा गुन्हा नाही का?

मसुराश्रमासारख्या हिंदुत्ववादी संघटनेने गावडा जमात ही हिंदूंच्या वर्णव्यवस्थेत बसत नाही, हे समजून घ्यायला नको होते काय? गोमंतकातील आदिवासी गावड्यांची संस्कृती व हिंदू धर्म जर एक असते तर गोमंतकातील हिंदू समाजाने जे आदिवासी करतात त्या देवांची पूजाअर्चा करायला नको होती का? ३३ कोटी देवाऐवजी देवचाराची आराधना करून त्याला विडी, रोट वाहिले नसते का? गावड्यांबरोबर जागराच्या मांडावर भट बामण नाचायला पाहिजे होते ना?

गावड्यांची दहाजण, बाराजाण, ‘भौस’ पद्धत व मृत्यूनंतर घरात घाडी खुदवणयाची पद्धत उच्चभ्रू समाजाने अवलंबली नसती का? गावडा जमात मेल्यानंतर प्रेत पुरायचे तशी हिंदूंनी ती पुरायला नको होती का? जर गावडे हे खरोखरच हिंदू आहेत मग त्यांचेच रीतीरिवाज उच्चवर्णीयांमध्ये असायला नको होते का? जे रीतीरिवाज गावड्यांमध्ये रूढ आहेत ते ब्राह्मण, क्षत्रिय ,वैश्य आणि शूद्र यांच्यामध्ये का नाही? ते तसे नसण्याचे कारण एकच की या गोमंतभूमीतील गावडा संस्कृती ही हिंदू धर्म संस्कृतीपेक्षाही पुरातन व श्रेष्ठ आहे.

गावडा संस्कृती ही पुरातन काळातील मुंडारी संस्कृतीचा वारसा सांगणारी आहे. म्हणून मुडंकार कायद्याच्या नावात ‘मुंड’ शब्दाला प्रत्यय लावून मुडंकार असे लिहिले जाते. तो मुंड शब्द मुंडारी संस्कृतीमधला आहे. पूर्वी गावडा हा मुद्दार म्हणून गावड्याला हिणवायचे. कालांतराने मुद्दार ही व्याख्या असंस्कृतपणाच्या उद्धार करण्यासाठी लोक वापरू लागले. जशी आज ‘तो मरे, गावडो’ ही संज्ञा वापरली जाते. भारतातील आदिवासीची संस्कृती आर्य संस्कृतीपेक्षा आणि त्याच्या कर्मकांडांपेक्षा मानवतेच्या पायावर आधारित उज्ज्वल परंपरा घेऊन मार्गक्रमण करीत आहेत, हे इथल्या धर्मपीठाधीशांना केव्हाच कळून चुकले होते.

आदिवासी संस्कृतीचा र्हास घडवून आणल्याशिवाय आणि भोळ्याभाबड्या लोकांच्या मनात देवाची भीती , दहशत निर्माण केल्याशिवाय आपल्या कर्मकांडांना कोणी विचारणार नाही, त्याचा स्वतःचा उदरनिर्वाह होणार नाही, भारतात हिंदू धर्माला बळकटी येणार नाही, हे या धर्मपीठाधीशांना पूर्ण माहीत होते आणि म्हणूनच अजूनपर्यंत या गोमंतभूमीत हे धर्मांध लोक धर्म शास्त्रातील कर्मकांडाच्या आधारे गावड्यांची पिळवणूक करतात. खरा स्वर्ग कुठे आहे? पाताळ कुठे आहे? हे या भोळ्या जमातीला या धर्मांध लोकांनी कधी सांगितलेच नाही.

देव हे स्वर्गात म्हणजेच अवकाशात वास करतात तर दानव हे नरकात असतात. दानवलोक अधांतरी अवकाशात भटकत असतात व देवाशी त्यांचे वैर म्हणून ते वाईट असतात, अशी या भाबड्या लोकांची त्याने समजूत करून दिली आहे. ‘इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ असे म्हणणार्या बळीराजाला या देवांनीच फसवले ना, जिथं आपल्या बळीराजाला हे आर्य संस्कृतीचे पूजक फसवू शकतात तिथे आपल्या गावडा जमातीला फसवायला त्यांना काय कठीण?

(लेखक ‘गाकुवेध’ संघटनेचे संस्थापक व प्रवक्ता आहेत.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM Pramod Sawant: परप्रांतीयांचा मुद्दा तापणार; मुख्यमंत्री सावंतांनी थेटच सांगितलं, 'प्रत्येक क्षेत्रात घुसखोरी'

Automated vacuum Sewer: आधुनिक पद्धतीने सांडपाणी व्यवस्थापन करणारे गोवा ठरले पहिले राज्य!

Sunburn Festival Goa: अमलीपदार्थ, देहव्यापाराला चालना देणारे उत्सव आमच्या इथे नकोच; दक्षिण गोव्यातले नेत्यांचा निर्धार

Baga Crime: गोव्यात पर्यटकांचा धुडगूस! स्थानिकांना मारहाण; संतप्त जमावाचा पोलिसांना घेराव

गोव्यात येऊन 'काहीही' करून चालणार नाही! पर्यटकांनी निसर्ग पाहावा, संस्कृती समजून घ्यावी; संपादकीय

SCROLL FOR NEXT