सासष्टी: गोव्यातील पोस्ट ऑफिस महाराष्ट्र सर्कलमध्ये समाविष्ट झाल्यानंतर, पूर्वी कार्यरत असलेले अनेक गोमंतकीय कर्मचारी निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी आता महाराष्ट्रीयन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांना गोव्यातील स्थानिक पत्ते तसेच पोर्तुगीजकालीन नावे समजत नसल्याने पत्रवाटपात मोठा विलंब होत असून काही वेळा पत्रांचे वितरण होतच नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
याचा फटका चांदर पोस्ट कचेरीला बसला असून गिरदोळी व चांदर परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वी येथे गोमंतकीय पोस्टमन कार्यरत होता. मात्र आता महाराष्ट्रीयन पोस्टमनची नियुक्ती झाल्यापासून पत्रांचे नियमित वितरण होत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पंच फ्रॅंक रॉड्रिग्स म्हणाले, या संदर्भात अनेक नागरिकांनी आपल्याकडे तक्रारी केल्या आहेत. आपण चांदर पोस्ट कचेरीत चौकशी केली असता, तेथील पोस्टमनने आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले.
तो नुकताच या पोस्ट कचेरीचा कार्यभार सांभाळत असल्याचेही त्याने स्पष्ट केले. नागरिकांची बँकांकडून येणारी चेकबुक, क्रेडिट कार्डची नोटीस तसेच अन्य महत्त्वाची पत्रे पोस्ट ऑफिसमध्येच पडून राहात आहेत किंवा वितरण न झाल्यामुळे ती परत बँकेत पाठवली जात आहेत.
त्यामुळे संबंधित नागरिकांना स्वतः बँकेत जाऊन ही कागदपत्रे घ्यावी लागत असल्याचे रॉड्रिग्स यांनी सांगितले. या पोस्ट ऑफिसमध्ये गोमंतकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पोस्टमनना योग्य पत्ते न समजल्याने पत्रवाटप होत नसल्याची परिस्थिती आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.