सासष्टी: गोव्यातील निसर्गरम्य समुद्र किनारे पर्यटकांचे आकर्षण असून लाखो पर्यटक ते पाहण्यासाठी येतात. मात्र इथे आल्यावर त्यांना वेगळा अनुभव येतो. दलाल, भटकी जनावरे पर्यटकांसाठी त्रासदायक ठरत आहेत.
या सर्वांवर उपाययोजना करण्यासाठी हल्लीच गोवा पर्यटन खाते, पशुपालन, मिशन रेबीज आदी अधिकारी तसेच गोवा शॅक मालक असोसिएशनचे प्रतिनिधी यांच्यामध्ये एक बैठक झाली. या बैठकीत पर्यटकांना सतावणाऱ्या दलालांना किनारपट्टीवरून हटविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. शिवाय भटके कुत्रे व गुरांसंदर्भात ठोस उपाययोजना आखण्याच्याही निर्णय घेण्यात आल्याचे कळते.
या बैठकीत पोलिस अधिकारीही उपस्थित होते. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा चर्चेला घेतला गेला. गोवा शॅक मालक असोसिएशनचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज यांच्या म्हणण्यानुसार भटक्या कुत्र्यांसंदर्भात तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. हे या बैठकीत अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
ही उपाययोजना तात्पुरती नसून कायमस्वरूपी असावी असेही सांगण्यात आले आहे. भटक्या कुत्र्यांनी चावे घेण्याचे प्रकार बेतालभाटी, कोलवा, बाणावली, केळशी या समुद्र किनाऱ्यांवर जास्त प्रमाणात होतात हे सुद्धा स्पष्ट करण्यात आल्याचे कार्दोज यांनी सांगितले.
दलालांकडून तसेच भटक्या जनावरांपासून होणारे त्रास उघड करण्यासाठी पर्यटक सोशल मीडिया माध्यमाचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे संपूर्ण गोव्याची बदनामी होत आहे, असेही कार्दोज यांचे म्हणणे आहे.
किनारी भागात भटक्या कुत्र्यांनी चावे घेण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक पर्यटक यामुळे जखमी झाले आहेत. याचा परिणाम पर्यटन क्षेत्रावर होत असल्याने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.