पणजी: गोव्यात डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात नाईट क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. याच दरम्यान इंडिगो कंपनीची विमानसेवा विस्कळीत झाली. यामुळे अनेक फ्लाईट्स रद्द झाल्या अथवा त्यांना विलंब झाला. या दोन्ही घटनांमुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाली का? तसेच, येत्या काळात राज्यातील पर्यटनावर परिणाम होईल का? याची माहिती खुद्द राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली आहे.
“नोव्हेंबर २०२५ मध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक संख्येने पर्यटक गोव्यात दाखल झाले”, अशी माहिती पर्यटनमंत्री खंवटे यांनी दिली. हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन नाईटक्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. यानंतर राज्यात पर्यटकांचा ओघ मंदावला आहे का? याबाबत मंत्री खंवटे बोलत होते.
“पर्यटन क्षेत्रात चढ-उतार होत असतात इंडिगोत सुरु असलेल्या समस्येमुळे ३० टक्के फ्लाईट्सवर परिणाम झाला. गोव्यात इंडिगोच्या अनेक फ्लाईट्स रद्द झाल्या किंवा विलंबाने लँड अथवा उड्डाण केले. पण, याबाबत विमान प्राधिकरणाशी बोलून समस्या सोडविण्यात आली होती”, अशी माहिती मंत्री खंवटे यांनी दिली. गोव्यात अगामी वर्षात सरत्या वर्षाच्या तुलनेत मोठ्या संख्येने पर्यटक येतील, असा विश्वास खंवटेंनी व्यक्त केला.
गोव्यात ०६ डिसेंबर रोजी बर्च बाय रोमिओ लेन नाईटक्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा बळी गेला. यानंतर राज्यातील बेकायदेशीर व्यवसाय, नाईटक्लब, डान्सबारचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने राज्यातील अवैध क्लब, व्यवसायांना टाळे ठोकण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय इंडिगोच्या अनेक फ्लाईट्स रद्द झाल्याने राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.