निमली-राजस्थान: ‘स्वयंपोशी विकास’ संकल्पनेअंतर्गत गोवा राज्याने ‘स्वच्छ ऊर्जा’, ‘शुद्ध पाणी’ निर्देशांकामध्ये ३६ राज्यांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. परंतु सागरी जैवविविधता, हवामान सुधार कृती, ‘उत्पादन व पुनर्निर्माणा’च्या पातळीवर कमालीची पिछाडी राहिली आहे.
येथे आयोजित अनिल अग्रवाल डायलॉग कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान व पर्यावरण केंद्राने (CSE) आज देशव्यापी अहवाल जाहीर केला. विविध क्षेत्रांमध्ये शाश्वत विकास घडवून आणत नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी निश्चित करून दिलेल्या उद्दिष्टांचा गोव्यापुरता आढावा घेतला असता, मूल्यांकन केलेल्या १०४ पैकी २० निर्देशांकांमध्ये राज्याने निम्मे लक्ष्यही साध्य केलेले नाही.
त्यात सुधारणा आवश्यक असल्याचा निष्कर्ष ‘अ डाऊन टू अर्थ’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून निघाला आहे. निमली येथे देश-विदेशातील तज्ज्ञांच्या उपस्थितीत पर्यावरणीय वाटचालीचा आढावा घेण्यात येत आहे. विज्ञान व पर्यावरण केंद्राने २०१५मध्ये ‘शाश्वत विकास २०३०’चे लक्ष्य बाळगले. तद्नंतर दहा वर्षांत झालेली प्रगती तसेच उणिवांचा अंदाज अहवालातून मांडण्यात आला आहे.
१. ‘उत्पादन व पुननिर्माण’च्या निर्देशांकात गोवा मागे राहिला आहे. त्यात केवळ ४७ गुण मिळाले असून, गोवा लाल श्रेणीत आहे. प्लास्टिक पुनर्वापर, जैविक कचरा व्यवस्थापन, इलेक्ट्रॉनिक कचरा, जीवाश्म इंधनाचा वापर या मुद्यांवर राज्याने गांभीर्याने विचार करण्याची गरज वर्तविण्यात आली आहे.
२. ‘स्वच्छ ऊर्जा’, ‘शुद्ध पाणी’ पुरविण्यात आवश्यक निकषांमध्ये राज्य अग्रेसर असल्याचे नमूद करून ‘पैकीच्या पैकी’ गुण देण्यात आले आहेत, ही जमेची बाजू आहे.
उपरोक्त अहवाल आयर्लंड येथील डब्लिन विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या ‘शाश्वत विकास अहवाल २०२४’, नीती आयोगाने जारी केलेल्या ‘एसडीजी इंडेक्स २०२३-२४’ वर आधारित आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.