सासष्टी : गोव्यात आपत्ती व्यवस्थापन कुचकामी ठरले आहे, हे गेले तीन ते चार दिवस पडत असलेल्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवरुन सिध्द झाल्याचे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी आज मडगावात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सासष्टीत तर आपत्ती व्यवस्थापन समितीचा एकही सदस्य दिसला नाही. त्या मानाने फातोर्डा मतदारसंघात जुन्या मार्केटमधील एक प्रसंग वगळता बाकी सगळीकडे कोणतीही वाईट परिस्थिती उद्भवली नाही.
माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांना पाठिंबा दर्शवून सरकारात सामील झाल्यावर फातोर्डात जो विकास केला त्याचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत, असेही सरदेसाई म्हणाले.
मोपासारख्या आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर सुद्धा पावसामुळे पाण्याखाली गेला व आपत्ती व्यवस्थापनाला तिथे पोचण्यासाठी एक दिवस लागला हे दुर्दैव असल्याचेही सरदेसाई म्हणाले. पश्र्चिम बगल रस्त्यासाठी घातलेल्या मातीच्या भरावामुळे जी पूरग्रस्त परिस्थिती उद्भवली, ती केवळ यंदापुरती असे सरकार सांगते.
हा मातीचा भराव काढला जाईल, असेही त्यांनी सांगितल्याचे सरदेसाई म्हणाले. त्यामुळे जो 1.3 किलोमीटर रस्त्याचा भागही स्टिल्टवर (खांबावर) उभारण्यात येईल, अशी आपले अपेक्षा असल्याचे सरदेसाई म्हणाले.
सरकारने सावध व्हावे
जेव्हा रेड अलर्ट जाहीर झाला, तेव्हाच आपत्ती व्यवस्थापनाने तयारी करायला हवी होती. हा तर जुलै महिना आहे व पुढील दोन महिने तरी पाऊस पडणार आहे, तेव्हा आपत्ती व्यवस्थापनाने सरकारने आताच सावध व्हायला पाहिजे, असा सल्लाही सरदेसाई यांनी दिला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.