पणजी: गोव्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी चतुर्थीच्या काळात पुन्हा पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
गोवा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट या दरम्यान राज्यात मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. या काळात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
मागील २४ तासांत राज्यात सरासरी ५.३ मिमी पावसाची नोंद झाली. यावर्षी आतापर्यंत एकूण ९८.४७ इंच पाऊस झाला असून तो सरासरीच्या तुलनेत सुमारे १.२ टक्के कमी आहे. शतक गाठण्यासाठी केवळ १.५० इंच पावसाची कमतरता असून आगामी दिवसांत पावसाची ती उणीव भरून निघेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
दरम्यान, गुरुवारी वाळपई, जुने गोवे, पेडणे, फोंडा व पणजी परिसरात तुरळक पाऊस झाला. शुक्रवारी मात्र दिवसभर चांगले ऊन पडल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. तरीही गणेशोत्सवाच्या दिवसांत पावसाचे आगमन होण्याची शक्यता असल्याने मंडप उभारणीसह इतर तयारीत दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.