पणजी: हडफडे येथील नाईटक्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा बळी गेला. या घटनेचे गोव्यासह देशात तीव्र पडसाद उमटले. याप्रकरणी अटकेत असलेल्या क्लबच्या मालकांना जामीन देऊ नये अशी मागणी या घटनेत बचावलेल्या दिल्लीच्या भावना जोशी यांनी म्हापसा कोर्टाकडे केली.
कोर्टात सुनावणी पार पडल्यानंतर जोशींनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अश्रु अनावर झाले. अशा प्रकारची दुर्घटना घडू शकते, असा विचारच केला नव्हता असे जोशी म्हणाल्या. नाईटक्लबला आग लागली त्यावेळी क्लबचे कर्मचारी काचेचे ग्लास आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न करत होते, असे जोशी म्हणाल्या.
बर्च बाय रोमिओ लेनचे मालक गौरव आणि सौरभ लुथरा यांची जागा कोठडीतच आहे त्यांना जामीन मिळाला नाही पाहीजे. ते बाहेर पडल्यास काहीही करु शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
केस मजबूत नसली तरी सरकार आमच्यासाठी लढत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. नाईटक्लबच्या आगीत जोशी यांचे पती आणि तीन बहिणींचा होरपळून मृत्यू झाला आहे.
नाईटक्लबच्या प्रशासनाने कोणत्याही नियमांचे पालन केले नव्हते. लुथरा बंधुंनी मोठी चूक केली आहे. घटना घडल्यानंतर त्यांनी देश सोडून थायलंड गाठले. त्याकाळात विमान तिकीट मिळत नव्हते तरी देखील तिकीट मिळवून ते पसार झाले, असे जोशी म्हणाल्या.
गोवा ट्रीपसाठी आम्ही पैशांची बचत करुन ट्रीप प्लॅन केली होती. पण, या दुर्घटनेमुळे आमच्या घरातील चार लोक आज आमच्यासोबत नाहीत, अशा शब्दात त्यांनी दु:ख व्यक्त केले.
भावना जोशींना यावेळी बोलताना अश्रु अनावर झाले. “आमच्या घरात एकच कमावता पुरुष होता, त्याचा अशाप्रकारे मृत्यू झाला. मुला बाळांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यासाठी आता कोणी नाही. न्यायालयाने आम्हाला न्याय द्यावा”, अशी मागणी केल्याचे यावेळी जोशी म्हणाल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.