Goa Assembly Session CM Pramod Sawant About Water Supply
पणजी: गोमंतकीयांना २४ तास पाणीपुरवठा करणे शक्य नाही; परंतु २०२६ पूर्वी राज्यातील प्रत्येक घरात किमान चार तास पाणीपुरवठा होईल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढील २५ वर्षांची तयारी म्हणून ३५० कोटी रुपये खर्चून तिळारी कालवा काँक्रिटीकरणाद्वारे बांधू, असे आज विधानसभेत सांगितले. राज्यात निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाईविषयी आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
उत्तर गोव्यात विशेषतः डिचोली, मये, पर्वरी, चिंबल आणि जुने गोवे येथे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. २४ तास नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने पावले उचलताना प्रत्येक घराला वैध क्रमांक द्यावा, अशी सूचना करीत शेट्ये यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हेल्पलाईन क्रमांकाविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिले.
मुख्यमंत्री म्हणाले की, गांजे येथे २५, तुये ३०, शिवोली ५.६, पिळर्ण १५, तर मेणकुरे येथे १० एमएलडी पाणी प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून साळ नदीतून पाणी अस्नोडा आणि पेडणे तालुक्यांत नेले जाणार असून त्याचे काम सुरू झाले आहे.
राज्यातील ४० टक्के लोकांना शून्य रुपये बिल येत आहे. ६० क्युबिक लिटर पाणी मोफत दिले जात आहे. अस्नोडा, पडोशे व तिळारी कालव्यांत दोन दिवसांपासून पाणी नाही. तिळारीचा कालवा महाराष्ट्राच्या हद्दीत फुटला, तो दुरुस्त करण्यासाठी आठ दिवस लागल्याचे त्यांनी नमूद केले.
मये आणि डिचोली मतदारसंघांतील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने मेणकुरे येथे १० एमएलडी क्षमतेचा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही मतदारसंघांतील पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. या कामाची निविदा काढल्याची माहिती त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मये आणि डिचोली मतदारसंघातून पाण्याविषयी फार गंभीर तक्रारी आलेल्या नाहीत. उत्तर गोव्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलस्रोत खात्याने कच्च्या पाण्याची पर्यायी सोय इतर ठिकाणांहून केली आहे.
पाण्याचा कमीत कमी अपव्यय करण्यावर ‘साबांखा’ने लक्ष केंद्रीत केले आहे. शिवाय ‘साबांखा’कडून पाणी प्रकल्पांचे अद्ययावतीकरण आणि आधुनिकीकरणाचा प्रयत्न सुरू आहे. शिवाय वितरण आणि साठवणूक पद्धतीवरही काम केले जाते. ‘साबांखा’च्या वतीने पाणी पुरवठ्यावर लक्ष केंद्रीत करताना त्यात अद्ययावतीकरण केले आहे. जलवाहिनीतील बिघाड शोधण्यासाठी ‘जीआयएस’वर आधारित मोबाईल ॲप तयार केले आहे. शिवाय या ॲपवर लोकांना तक्रारी नोंदविता येणार आहेत.
आमदार चंद्रकांत शेट्ये म्हणाले, डिचोली-मये मतदारसंघासाठी १० एमएलडी प्रकल्प कामाची निविदा काढण्याचे आदेश निघाले असले तरी प्रत्यक्षात काम सुरू होण्यास वेळ लागणार आहे. ८३ कोटींचा हा प्रकल्प असून तो पूर्ण होण्यासाठी एक ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
नानोडा-पिस्तेवाडा, साळ पुनर्वसन, वडावळ-नाईकवाडा, लामगाव, बोड्डा वरचावाडा याठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. साळ येथील पाण्याचा प्रकल्प अद्ययावत करावा, अशी मागणी केली आहे,परंतु ती पूर्ण झाली नाही. डिचोलीच्या अभियंत्यांना सांगून पाणी समस्या सोडवावी, अशी मागणी लक्षवेधी सूचना करताना आमदार शेट्ये यांनी केली.
आमदार मायकल लोबो म्हणाले की, किनारी भागात गृहनिर्माण सोसायटींना पंचायती तत्काळ परवानगी देतात. या सोसायट्यांना पाणी कसे देणार याचे नियोजन नाही. किनारी भागात दोन दिवसांतून एकदा पाणी येते. मुख्यमंत्र्यांनी पाणी समस्या जाणून घ्यावी. गृहनिर्माण सोसायट्या, हॉटेलधारक, रेस्टॉरंटवाले पंप लावून पाणी ओढतात.
महाराष्ट्र राज्याला तिळारी कालव्याच्या कामासाठी १२० कोटी रुपये दिले जाणार आहेत. त्या कामाला पुढील वर्षी सुरुवात होईल. या कामामुळे गोवा राज्य पाणी पुरवठ्यामध्ये स्वयंपूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागात पाण्याची समस्या मोठी आहे. व्यावसायिक सोसायट्यांना पाणी देण्याबाबत विचार करावा, तसेच पाणी साठवणुकीसाठी सुविधा निर्माण कराव्यात. शिवोलीसाठी १५ एमएलडी प्रकल्पाची गरज आहे. मी केवळ माझ्या मतदारसंघाचा प्रश्न मांडत नाही, तर किनारपट्टी भागातील पाणी प्रश्न मांडत आहे.मायकल लोबो, आमदार, कळंगुट
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.