Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीची राज्यात जय्यत तयारी सुरु आहे. राज्यातील दोन्ही जागा जिंकण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर दुसरीकडे, विरोधक भाजपला दोन्ही जागांवर पटकणी देण्यासाठी आपली ताकद लावत आहे. दरम्यान, विरोधकांकडून अनेक प्रलंबित मुद्दे उपस्थित केले जात आहेत. सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.
दरम्यान, गोव्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर गोव्याची तर काँग्रेसने दक्षिण गोव्याची जागा जिंकली होती. उत्तर गोव्यात भाजपचे वर्चस्व मानले जाते, जिथे भाजप नेते श्रीपाद नाईक 1999 पासून सातत्याने खासदार म्हणून निवडून येत आहेत. यावेळीही भाजपने नाईक यांनाच येथून उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे, दक्षिण गोव्यात काँग्रेसची पकड मजबूत असल्याचे मानले जाते.
उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमाकांत खलप यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री आणि पाच वेळचे खासदार श्रीपाद नाईक निवडणूक लढवत आहेत. जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे, तसतशी गोव्यात निवडणुकीची उत्सुकता वाढत आहे. काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांनी राज्यातील वाढती 'बेरोजगारी' हा निवडणुकीचा मुद्दा बनवला. त्याचबरोबर त्यांनी नव्याने बांधलेल्या मोपा विमानतळावर पेडण्यातील स्थानिकांना रोजगार देण्याचे काय झाले असा सवाल उपस्थित केला. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही, असा घणाघात खलप यांनी केला.
खलप म्हणाले की, "मोपा विमानतळ सुरु झाल्यामुळे पेडण्याचे तरुण आपल्या हाताला काम मिळणार या आशेवर होते. ते याकडे रोजगाराचा संभाव्य स्रोत म्हणून पाहत होते. मात्र, त्यांना आता आपल्या हाताला काम मिळणार नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री सावंत यांच्याच मतदारसंघातील लोकांनाच यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. स्थानिक तरुणांची फसवणूक झाल्याची भावना व्यक्त होत आहे.'' अलीकडेच स्थानिक लोकांच्या एका गटाने पेडणेकरांच्या मागण्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे केली.
पेडणेकर आता त्यांचा राग मतदानाच्या माध्यमातून व्यक्त करतील असेही खलप पुढे म्हणाले. दरम्यान, खलप यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना नाईक यांनी खलप यांना 1999 च्या पराभवाची आठवण करुन दिली. नाईक म्हणाले की, 1999 निवडणुकीत खलप पराभूत झाले होते. आताही ते पराभूत होतील. ती माझी पहिली निवडणूक होती आणि तेव्हा ते केंद्रीय मंत्री होते, तरीही ते मला पराभूत करण्यात अपयशी ठरले होते.'' अशा परिस्थितीत एकीकडे काँग्रेस स्थानिकांना नोकऱ्या न देण्याचा निवडणुकीचा मुद्दा बनवत असताना दुसरीकडे भाजप संपूर्ण राज्यातील विकासकामांवर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, जनता कोणाच्या बाजूने आहे हे 4 जून रोजी ठरेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.