काणकोण: राजबाग-तारीर येथील तीन युवकांना येथील हॉटेल व्यवस्थापनाच्या तक्रारीवरून गुरुवारी रात्री पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी प्रथम उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची वैयक्तिक जामिनावर सुटका केली.
गुरुवारी रात्री आंब्यानास या देवालयाच्या ८ तारखेला असलेल्या वर्धापनदिन कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी काही युवक देवालयाच्या आवारात आले होते. त्यांनी आपल्या गाड्या हॉटेलसमोरून तारीर-राजबाग येथे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला पार्क केल्या होत्या.
या हॉटेलच्या (Hotel) सुरक्षा रक्षकांनी त्या गाड्या काढण्यासाठी येथील युवकांना जबरदस्ती केली त्यावेळी हॉटेल व्यवस्थापन व येथील युवक यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
हा रस्ता खासगी आहे. त्या रस्त्याच्या कडेला फक्त हॉटेल व्यवस्थापन व हॉटेलात उतरणारे पर्यटकच गाड्या पार्क करण्यासाठी व्यवस्था असल्याचे व्यवस्थापनाने सांगितल्याने येथील रहिवाशांमध्ये असंतोष पसरला आहे.
गेल्या काही दिवसांमागे राजबाग-तारीर येथील युवकांनी रोजगारासंबंधी (Employment) या भागातील दोन पंचतारांकित हॉटेल व्यवस्थापनांविरुद्ध पत्रकार परिषद घेऊन एल्गार व्यक्त केला होता.
हॉटेल व्यवस्थापनांनी आश्वासन दिल्याप्रमाणे रास्त मागण्या घेऊन हॉटेल व्यवस्थापनाशी चर्चा करण्यास गेलेल्या युवकांच्या गटाविरुद्ध काणकोण पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
या खोट्या तक्रारी मागे न घेतल्यास संपूर्ण राजबाग-तारीर येथील रहिवाशांना एकत्र करून या हॉटेल व्यवस्थापनाविरुद्ध आंदोलन छेडण्याचा इशारा या युवकांनी दिला होता. यावेळी यशवंत मडगावकर, वैष्णव पेडणेकर, सुरेश, रविश कोमरपंत, अभिषेक पागी व अन्य युवक उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.