पणजी: राज्यातील गुन्हेगारी आताच सुरू झालेली नाही, ती पूर्वीपासून होतच आहे. पण, सध्याचा काळ सोशल मीडियाचा असल्यामुळे घडणारे गुन्हे लगेच त्यावरून व्हायरल होतात. त्यामुळे त्यांची चर्चा अधिक होते असे सांगत, राज्यातील गुन्ह्यांचे प्रमाण घटल्याचे पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील गुन्हेगारीसंदर्भातील घटनांमध्ये वाढ झालेली आहे. चोऱ्या, दरोडे, मारहाणीसारखे प्रकार वाढत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी महासंचालक अलोक कुमार यांना छेडले असता, गोव्यात सध्याच गुन्हे घडतात असे नाही. गुन्हेगारी पूर्वीपासूनच सुरू आहे. परंतु, सध्याच्या काळात सोशल मीडिया अधिक सक्रिय झालेला आहे. त्याच्या माध्यमातून गुन्हेगारीसंदर्भातील घटना तत्काळ व्हायरल होतात, असे निरीक्षण अलोक कुमार यांनी नोंदवले.
राज्यातील एका क्लबमध्ये दिल्लीतील पर्यटकांना मारहाण झाल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. संबंधित पर्यटकांनी आपल्याला बाऊन्सर्सनी मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केलेली आहे. याबाबत विचारले असता, बाऊन्सर एजन्सी चालवण्यासाठी पोलिसांचा परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व क्लब आणि कार्यक्रम आयोजकांनी परवानाधारक एजन्सीमार्फतच बाऊन्सर नेमावे. काही एजन्सी परवाना न घेताच बाऊन्सर्सची नेमणूक करीत असल्याचे गेल्या काही दिवसांत उघड झाले. अशा प्रकारच्या तीन एजन्सी बंद करण्यात आल्या आहेत.
करंजाळे समुद्र किनारी काहीच दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या ‘ओशेनमॅन’ कार्यक्रमाला पर्यटन खात्याने परवानगी दिलेली नव्हती. हा कार्यक्रम आयोजकांनी एका आयपीएस अधिकाऱ्याला हाताशी धरून आयोजित केल्याचा दावा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केला होता.
त्यावर बोलताना, करंझाळे किनाऱ्यावर विनापरवाना कार्यक्रम सुरू असल्याची माहिती मिळताच पणजी पोलिसांनी तो बंद पाडला. शिवाय आयोजकाविरुद्ध एफआयआर नोंदवून त्याला अटकही केली. परंतु, या कार्यक्रमाच्या आयोजनात आयपीएस अधिकाऱ्याचा हात असल्याची माहिती अजूनपर्यंत आपल्याला मिळालेली नाही, असेही अलोक कुमार यांनी नमूद केले.
१.जैतीर–उगवेतील गोळीबारात आयआरबीच्या पोलिसांचा सहभाग असल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. याआधीही अशा गुन्ह्यांत आढळलेल्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
२.गोळीबारात सहभागी असलेल्यांसोबत गेलेल्या दोन पोलिसांची चौकशी करण्यात येत आहे. काही व्यक्ती वैयक्तिकरीत्या गुन्ह्यात आढळल्या आहेत. त्याचा दोष संपूर्ण पोलीस दलाला देणे चुकीचे आहे.
गोवा पर्यटन राज्य असल्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक गोव्याला भेट देत असतात. पर्यटकांना वाहने भाड्याने देताना त्यांच्याकडून मिळणाऱ्या ओळखपत्रांची सत्यता तपासा. त्यांच्या कागदपत्रांबाबत संशय आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन महासंचालक अलोक कुमार यांनी भाड्याने वाहने देणाऱ्या एजन्सींना केले.
जैतीर-उगवे येथे रेती व्यवसायातून झालेल्या गोळीबारप्रकरणी पेडणे पोलिसांनी अटक केलेले संशयित नितीन महाले (२०), आशिष महाले (२४), आकाश महाले (२४), ऋषिकेश महाले (३२), गंगाराम महाले यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पेडणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन लोकरे हे पुढील तपास करत आहेत.
नावेली येथील तरुणाला पोलिस उपनिरीक्षकाकडून जबर मारहाण होण्याच्या घटनेबाबत विचारले असता, संशयित उपनिरीक्षकाची सध्या चौकशी सुरू आहे. मारहाण प्रकरणात तो दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही अलोक कुमार यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.