Cashew farming challenges In Goa
मडगाव: लहरी हवामान व इतर कारणांमुळे पिकात झालेली घट, तसेच खर्च व उत्पन्नाचा न बसणारा मेळ यामुळे गोव्यातील काजू पीक संकटात सापडले आहे. काजू पीक किफायतशीर होण्यासाठी किमान २०० रुपये हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी काजू उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.
दरम्यान, काजू खरेदी करण्यात अग्रेसर असलेल्या आदर्श कृषी खरेदी विक्री सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप तसेच गोवा बागायतदारचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर यांनीही काजूला २०० रुपये हमीभाव मिळावा, अशी मागणी केली आहे.
काजूचा हंगाम सुरू झाला असला तरी हंगामाच्या पहिल्या टप्प्यात पिकात मोठ्या प्रमाण घट झालेली आहे. आदर्श कृषी संस्थेकडून एरव्ही हंगामात मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात काजू शेतकऱ्यांकडून किमान १०० टन काजूची खरेदी केली जाते. यंदाच्या हंगामात मात्र १३ मार्चपर्यंत केवळ १३ टन काजूची खरेदी झाली. पिकात यंदा मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे हे घडले आहे, असे आदर्श कृषी खरेदी विक्री सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश शंकर वेळीप यांनी सांगितले.
काजू हंगाम ९० दिवसांचा असतो व काजूला तीन टप्प्यांत मोहर येतो. पहिल्या टप्प्यात मोहर आला होता; पण वेगवेगळ्या कारणांमुळे फलधारणा न झाल्याने पीक कमी आले आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात पिकात वाढ होण्याची शक्यता धरली तरी पिकाचे एकूण प्रमाण
६० ते ७० टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही. सरकारने काजूचा हमीभाव १५० रु.वरून १७० रु. केला आहे. पण खर्च व उत्पन्नाचा मेळ बसत नसल्याने हमीभाव २०० रुपये करण्यात यावा, असे मत वेळीप यांनी व्यक्त केले.
आफ्रीकन तसेच दक्षिण अमेरिकन देशांतून गोव्यात काजूच्या कमी दरात होत असलेल्या आयातीमुळे गोव्याच्या काजूला खुल्या बाजारात चांगला दर मिळत नाही. विदेशातील काजू ७०-८० रुपये किलो या दराने काजू व्यावसायिकांना उपलब्ध होत असल्याने त्याचा गोव्यातील काजूला फटका बसतो.
यावर उपाययोजना म्हणून सुपारी व काळी मिरीसह काजूच्या आयातीवर शुल्क वाढवण्याचे किंवा आयात बंद करण्यात यावी, असे मत सावईकर यांनी व्यक्त केले. सावईकर यांनी गोवा बागायतादार संस्थेतर्फे केंद्रीय वाणिज्य व व्यापार मंत्री जितीन प्रसाद यांना यासंबंधी एक निवेदनही दिले आहे.
झांट्ये काजू आस्थापनाचे रोहित झांट्ये यांनी मात्र यंदाच्या हंगामात दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात काजू पिकात वाढ होईल, असा आशावाद व्यक्त केला. या हंगामाच्या सुरुवातीलाच काजूचा दर १६१ रुपये असून गेल्या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला काजूचा दर १११ रुपये होता. यंदा काजूला चांगला दर मिळाला असून असा दर यापूर्वी २०१८ मध्ये मिळाला होता. काजू बागायतदार, काजू व्यावसायिकांना हे चांगले संकेत आहेत, असे झांट्ये यांनी सांगितले.
काजू बागायतीतील सफाई कामासाठी येणारा खर्च, मजुरी आणि काजू उत्पन्नाचा मेळ बसत नसल्याने काजू पीक किफायतशीर राहिलेले नाही. सरकारने हमीभाव १५० वरून १७० केल्याने बागायदारांना थोडाफार दिलासा मिळत असला तरी हे पीक फायद्याचे ठरत नाही. काजू पीक किफायतशीर ठरण्यासाठी हमीभाव २०० आवश्यक आहे.ॲड. नरेंद्र सावईकर, अध्यक्ष, गोवा बागायतदार संस्था
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.