पणजी: चोडण जेटीवर सोमवारी (२३ रोजी) पहाटे नांगरून ठेवलेली व पाण्यात बुडालेली ‘बेती’ नामक फेरीबोट काढण्यास तळाला असलेल्या गाळाचा अडथळा येत आहे. बोटीच्या तळाला लोखंडी साखळी टाकण्याचे अवघड काम करताना पाणबुड्यांना गढूळ पाण्यामुळे जिकीरीचे होत आहे. रविवारी ओहोटीच्यावेळी पाणबुड्याने साखळी टाकली, परंतु ती व्यवस्थितरित्या बसली नाही, त्यामुळे आता पुन्हा एकदा ओहोटीसाठी त्यांना थांबावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे काम आता सोमवारी दुपारपर्यंत होण्याची शक्यता आहे.
रविवारी फेरीबोट बाहेर येईल, असा विश्वास वाटत होता, परंतु तळाला असलेल्या पंख्याशेजारी चेन व्यवस्थितरित्या बसली नाही. त्याशिवाय तळाला मोठ्या प्रमाणात गाळ आहे, त्याशिवाय गढूळ पाणी असल्याने पाणबुड्याला साखळी (चेन) टाकताना त्याचा अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून आले.
फेरीबोट काढण्यासाठी कार्यरत असलेले कर्मचारी ओहोटीच्यावेळी पाणबुड्यांना घेऊन कामाला लागले. यात पाणबुड्यांनी चेन टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. सोमवारी दुपारपर्यंत फेरीबोट उचलली जाईल, असा अंदाज येथील कर्मचाऱ्यांचा आहे.
सात दिवस बोट पाण्यात राहिली असल्याने ही बाब चर्चेचा विषय ठरत आहे. शिवाय नदी परिवहन खात्याकडे अशी घटना घडल्यानंतर तत्काळ करावी लागणारी आवश्यक उपाययोजना उपलब्ध नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. हा प्रकार नदी परिवहन खात्याला धडा देणारा ठरणारा आहे. भविष्यात अशा घटना घडल्यास काय उपाययोजना गरजेच्या आहेत, त्या अनुषंगाने त्यांचा समावेश खात्यात करून घेणे गरजेचे आहे. त्यानुषंगाने निश्चित पावले उचलले जातील, असेही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
फेरीबोटींची तपासणी करण्याची मागणी
हल्लीच चोडण येथे एक फेरीबोट बुडाली, तर दुसऱ्या एक फेरीबोट प्रवासी असताना मध्येच बंद पडली, पण तिथूनच जाणाऱ्या बार्जला धक्का बसण्यापासून ती थोडक्यात बचावली. या घटना ताज्या असताना राशोल येथील समाज कार्यकर्त्यांनी गोव्यातील फेरीबोटींची तात्काळ तपासणी करण्याची मागणी केली आहे. समाज कार्यकर्ते रॉक मास्कारेन्हस म्हणाले, २०१२ मध्ये भारतीय जनता पक्ष गोव्यात सत्तेवर आला, तेव्हा गोव्यात ३३ फेरीबोटी होत्या. त्यानंतर केवळ ८ नवीन फेरीबोटी घेतल्या आहेत. त्यांची देखभाल दुरुस्ती वेळोवेळी होत नाही. ज्या घटना चोडण येथे झाल्या तशा प्रकारच्या घटना राशोल धक्क्यावरसुद्धा होण्याची शक्यता व्यक्त केली. शिरोडा, पंचवाडी, बोरी येथील नागरिक सासष्टीत यायला याच जलमार्गाने येतात असे मास्कारेन्हस यांनी सांगितले. ज्या फेरीबोटी आहेत, त्या गंजलेल्या आहेत. कर्मचारी वर्ग प्रशिक्षित नाही. सुरक्षेचा अभाव आहे. सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ज्या जुन्या फेरीबोटी आहेत त्याजागी नवीन घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पात यासाठी आर्थिक तरतूद केली जाते. मग हा पैसा जातो कुठे असा प्रश्नसुद्धा त्यांनी उपस्थित केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.