Chapora River Sand Extraction
पणजी: वन खात्याने आपला अभिप्राय गेल्या दोन महिन्यांत न दिल्याने सुमारे दहा हजार घरांच्या बांधकामांसाठी लागणारी रेती उपलब्ध करण्याच्या सरकारी प्रयत्नांना खीळ बसली आहे. शापोरा नदीतून ही रेती राज्य सरकार कोणतेही पैसे न देता काढणार आहे.
शापोरा नदीच्या मुखाजवळ रेतीचा पट्टा निर्माण झाल्याने ओहोटीवेळी तो मच्छीमारी ट्रॉलर्स व नौकांना ते त्रासदायक ठरत आहे. हा गाळ उपसण्यासाठी बंदर कप्तान खात्याने प्रयत्न चालवले होते. राज्य सरकार त्यासाठी ७ कोटी रुपये खर्चाच्या तयारीत होते. मात्र, आता ही रेती सरकारला मोफत काढून मिळणार आहे.
बंदर खात्याचे मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्यासमोर अधिकाऱ्यांनी गाळ उपासण्याचा मुद्दा ठेवला तेव्हा त्यांनी ‘रेती काढण्यासाठी सरकारने पैसे का खर्च करावेत?’ असा प्रश्न केला. रेती काढून त्याच कंपनीला विक्रीची मुभा दिली तर कोणतीही कंपनी गाळ उपसून ती रेती विकण्यास तयार होईल, असा विचार त्यांनी मांडला आणि तो आता प्रत्यक्षात आणला जात आहे.
शापोरा नदीच्या मुखाजवळ साचलेली १ लाख २५ हजार घनमीटर रेती काढण्यासाठीची बोली मे. ‘अलायन्स ट्रान्सलाईन एलएलपी’ने जिंकली आहे. कंपनी ते काम मोफत करून काढलेली रेती विकणार आहे. राज्यात सध्या असलेला रेतीचा तुटवडा लक्षात घेता रेतीला चांगला दर मिळणार हे निश्चित आहे. खाण खात्याने मांडवी व झुआरी नदीत रेती काढण्यासाठी परवाने जारी करून रेती काढण्याचे काम गती घेईपर्यंत शापोरा नदीतील ही रेती उपलब्ध होणार आहे.
सध्या या कंपनीला रेती काढण्यासाठी सागरी अधिनियमाअंतर्गत परवानगीची प्रतीक्षा आहे. गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली होती.
त्यावेळी वन खात्याच्या प्रतिनिधीने रेती उपसा केल्यास कासवे अंडी घालण्याच्या ठिकाणांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली होती. त्यानंतर प्राधिकरणाने वन खात्याला पत्र लिहिले, जानेवारीत स्मरणपत्रही पाठवले. मात्र वन खात्याकडून काहीही कळविले न गेल्याने बंदर कप्तान खाते त्या कंपनीला काम सुरू करण्याचा अंतिम आदेश देऊ शकलेले नाही.
शापोरा नदीच्या मुखाजवळ गाळ साचल्याने परिवहनास अनेक अडचणी येतात. पहिली गोष्ट म्हणजे गाळ साचल्याने नदीच्या तळाची खोली कमी होते, बोटींना मार्गक्रमण करणे कठीण होते. गाळ साचल्याने पूर येण्याची शक्यताही वाढते. जेव्हा नदीचे मुख अरुंद होते, तेव्हा पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही आणि अतिवृष्टीच्या काळात पूरस्थिती निर्माण होऊ शकते.
१ लाख २५ हजार घनमीटर रेती म्हणजे एका मोठ्या टिपर ट्रकमध्ये सुमारे १० घनमीटर रेती मावली तर साडेबारा हजार ट्रक रेती. जर या रेतीचा वापर बांधकामासाठी केला तर सुमारे दहा ते बारा हजार घरे बांधता येतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.