Cashew Farming in Goa
वाळपई: सत्तरी तालुक्यातील बागायतदारांचे सुपारीनंतर काजू हे पीक खूप महत्त्वपूर्ण आहे. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या थंडीमुळे सध्या तरी येथील काजू पिकाला पोषक वातावरण बनले आहे. मोहरसुद्धा चांगला आला आहे.
‘फेंगल’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यातील थंडी गायब झाली होती. त्यामुळे बागायतदार चिंतेत सापडले होते. परंतु आता गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या थंडीमुळे काजूच्या झाडांना मोहर येऊन चांगले व पोषक वातावरण तयार झाले आहे. पण थंडीबरोबरच रात्रीच्या वेळी दव पडत असल्याने थोडी चिंता वाढली आहे. दव जास्त प्रमाणात पडला तर काजू पिकावर टी-मोस्किटोचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
मागील काही वर्षांत बदलते हवामान, वातावरण, पीक संरक्षणाचे उपाय न करणे आदी कारणांमुळे काजूची मोठी आणि जुनी झाडे मरण्याचे प्रमाण वाढले आहे. साहजिकच बागायतदारांची डोकेदुखी वाढली आहे. ‘रोटा’ ही कीड काजू पिकाचे जास्त नुकसान करत आहे. झाडाचे खोड, मूळ पोखरून पूर्ण झाड नष्ट करण्याची क्षमता या किड्यात आहे. त्यामुळे दरवर्षी शेकडो झाडे मरू लागली आहेत. साहजिकजच उत्पादनावर परिणाम होतोय.
राज्यात काजू पिकाला व्यावसायिक महत्त्व आहे. गोव्यात येणारे पर्यटक काजूबियांची चव चाखल्याशिवाय जात नाहीत. गोव्यातून निघतानाही ते काजूगराची पाकिटे घेऊन जातात. सत्तरी तालुक्यात डोंगराळ भागात काजूची लागवड प्रामुख्याने करण्यात आली आहे. अशी जुनी झाडे पन्नास-साठ वर्षे जगून आजही उत्पादन देत आहेत. पण काळानुरूप झालेल्या सर्वच प्रकारच्या बदलांमुळे काजूची झाडे अलीकडे मरण पावत आहेत. रोपापासून लावलेले प्रत्येक झाड हे गुणधर्माने भिन्न असते. त्यामुळे काजूबियांचा आकार, बोंडूंचा रंग व झाडांचा विस्तार इत्यादी देखील भिन्न असतात. हे नगदी पीक आहे.
सध्या तरी काजू पिकासाठी चांगले वातावरण आहे. मध्येच पाऊस पडला होता. त्यामुळे आंबा पिकाला मात्र मोहर येण्यास विलंब होऊ शकतो. कारण आंबा पिकाला पावसाळा संपला की कडक ऊन पाहिजे असते. त्यामुळे कार्बनची व पर्यायाने फुलांची लवकर वाढ होते. फळधारणाही चांगली होते.
कार्बन व नायट्रोजन यांचा समतोल झाला तर ते आंबा पिकाला फायदेशीर असते. अलीकडे सत्तरीत पाऊस पडला. त्यामुळे आंबा पिकाला मोहर उशिरा येऊ शकतो. पण काजू पिकासाठी चांगले वातावरण आहे.
आणखी पंधरा दिवस सतत थंडी पडली तर मोहर आणखी चांगला येऊ शकतो. थंडीसोबत दव पडत राहिला तर मात्र टी-मोस्किस्टो किडीचा प्रादुर्भाव होण्याची चिन्हे आहेत.
दव पडल्यामुळे ही कीड फांदीच्या पुढील पालवीचा दांड्यातील रस शोषून घेतात व स्वत:च्या शरीरातील घाण आत सोडतात. त्यामुळे फंगस तयार होऊन दांडे सुकतात. म्हणून दव पडण्याचे प्रमाण बंद झाले पाहिजे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.