Goa Cashew History Dainik Gomantak
गोवा

Goa Cashew History: 'काजू'चा गोव्याशी ऐतिहासिक संबंध; पोर्तुगीजांनी आणलेली वृक्षसंस्कृती आज बनली नगदी पीक

Goa Cashew: सुमारे पाचशे वर्षांपूर्वी भारतात (गोव्यात) आलेले हे झाड अगदी अलीकडच्या काळात म्हणजे सुमारे १९६० च्या दशकात व्यावसायिक उत्पन्नासाठी ओळखले जाऊ लागले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

जूचा मोसम भरात येऊ लागला आहे. बाजारात काजू निराच्या (विशिष्ट प्रकारे काढलेला काजू फळांचा रस) बाटल्या टोपल्यात मांडून ठेवलेल्या दिसत आहे. मोसमाची सुरुवात असल्याकारणाने सध्या २०० रुपये लिटर असलेला निरा पुढील महिन्यात १०० रुपये लिटर होईल अशी आशा आपण करुया.

पण सध्या २०० रुपये लिटर अशी वाढीव किंमत असूनही निरा हातोहात खपतो आहे ही बाबच काजूच्या मोसमाचे स्वागत आपण किती दिलखुलासपणे करतो याची साक्ष आहे. (हुर्राकबद्दल तर लिहायलाच नको.) काजूंच्या रानात ओल्या काजू बी वरची फिकट तपकिरी साल काढून आतला कुरकुरीत गर खाण्याचा आनंद घ्यायलाही अनेकांनी सुरुवात केली असेल. 

आपल्या गोव्यात काजू हुर्राक किंवा फेणीसाठी ओळखला जातो. गोवा फेणीला तर भौगोलिक मानांकनही (GI Tag) प्राप्त झालेले आहे पण याचा अर्थ असा नाही की देशात इतरत्र काजूपासून मद्य तयार होत नाही. मलबार, तामिळनाडू  या भागांतही काजूच्या बोंडापासून विविध तऱ्हेचे मद्य तयार केले जाते.

आज भारतात विविध ठिकाणी काजूची लागवड ही नगदी पीक म्हणून केली जात असली तरी पोर्तुगीजांनी सर्वात प्रथम काजूची झाडे ब्राझीलवरून वनीकरण आणि जमिनीची धूप रोखण्यासाठी गोव्यात आणून लावली. गोव्यामधून नंतर काजू देशाच्या इतर भागात पोहोचला.

सुमारे पाचशे वर्षांपूर्वी भारतात (गोव्यात) आलेले हे झाड अगदी अलीकडच्या काळात म्हणजे सुमारे १९६० च्या दशकात व्यावसायिक उत्पन्नासाठी ओळखले जाऊ लागले आहे. उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती आणि शास्त्रीय पद्धतीने काजूची लागवड या काळातच सुरू झाली. संशोधन, विकास संस्था आणि बागायतदार यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे काजू बागायतींचा विकास वैज्ञानिक पद्धतीने होऊ लागला.

मूलतः उष्णकटिबंधीय असलेले हे पीक आज पश्चिम किनाऱ्यावरील गोवा, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यात तसेच पूर्व किनाऱ्यावरील तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये घेतले जाते.

त्याशिवाय छत्तीसगड तसेच ईशान्येकडील आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या राज्यांमध्ये व अंदमान निकोबार बेटावर मर्यादित प्रमाणात काजूची लागवड होते. आज काजू हे देशातील सर्वात महत्त्वाचे फलोत्पादन पीक बनले आहे आणि भारतातून निर्यात होणाऱ्या कृषी बागायतीच्या उत्पन्नामध्ये त्याचा क्रमांक वरचा आहे.

आज गोव्यात ५५ हजार हेक्टरपेक्षा अधिक जमीन काजू लागवडीखाली आहे. व्यावसायिक असण्याव्यतिरिक्त काजू आज सर्वात लोकप्रिय उत्पादन आहे. काजूची फळे विटामिन सी आणि मॅग्नेशियमचा उत्कृष्ट स्त्रोत असलेली असतात तसेच तांबे, पोटॅशियम आणि लोह यांची मात्रा त्यामध्ये असते.

तंतूनी  (फायबर) भरपूर असलेले हे फळ पचन संस्थेच्या सफाईसाठी ओळखले जाते. अॅंटिऑक्सिडंट्सनी भरपूर असलेले हे रसदार फळ शरीरातील चरबी जाळण्यासही मदत करते. तेव्हा निरा, हुर्राक किंवा फेणी यापुरते काजूला न ओळखता काजू फळाचाही आस्वाद मोसमात अवश्य घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026: आयपीएल ब्रेकिंग! मुंबई-कोलकाता सामना संपताच मूत्यू; मुंबईतील हॅाटेलमध्ये सापडला मृतदेह

Guru Gochar 2026: नशिबाचा मास्टरस्ट्रोक! 'या' 5 राशींसाठी एप्रिल महिना ठरणार 'टर्निंग पॉईंट'; धन वर्षावासह करिअरमध्ये प्रगतीची संधी

Dailyhunt आणि Josh च्या प्रगतीला नवा वेग! पी. आर. रमेश आता सांभाळणार VerSe Innovation च्या ऑडिट कमिटीची धुरा

US Iran War: 21 युद्धनौका, 3500 कमांडो, 50000 सैनिक… तरीही ट्रम्प इराणचे 440 किलो युरेनियम जप्त करु शकणार नाहीत, कारण काय?

Yellow Alert In Goa: हुश्श! गोव्याचा उकाडा कमी होणार; हवामान खात्याकडून पुढच्या 48 तासांसाठी पावसाचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

SCROLL FOR NEXT