कळंगुट, मार्च महिना सुरू झाला, की पिण्याच्या पाण्यासाठी बार्देशकरांची वणवण ही ठरलेलीच असते. यंदा तालुक्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
किनारी भागात वास्तव्य करून राहणाऱ्या लोकांचे हाल सुरू होतात. पाणी वेळेवर सोडले जात नाही. रात्रीअपरात्री पाणी सोडले जाते, त्यामुळे गृहिणींना पाण्यासाठी धावपळ करावी लागते. पंधरा दिवसात तालुक्यात पाणी पुरवठा सुरळीत करा, अन्यतः पाण्यासाठी घागर मोर्चा, अभियंत्यांना घेराव सारखे कार्यक्रम हाती घेतले जातील, असा इशारा महिलावर्गातर्फे देण्यात आला आहे.
बार्देश तालुक्यातील कळंगुट, कांदोळी, सिकेरी तसेच आंसगांव -बादें, हणजुण -वागातोर आणि कायसुव -शापोरा या भागातील जनतेला बाराही महिने पाण्यासाठी धावपळ करावी लागते. यंदा उष्मा वाढला असून पाणी आवश्यक आहे. तरीसुद्धा वेगवेगळी कारणे सांगून पाणी पुरवठ्याकडे दुर्लक्ष केले जाते, हा प्रकार त्वरित बंद झाला पाहिजे. लोकप्रतिनिधींनी त्वरित सुरळीत पाणी पुरवठा करावा, अशी गृहिणींची मागणी आहे.
गेले दहा- बारा दिवस शिवोली मतदारसंघातील संपूर्ण आसगाव तसेच वाडी- शिवोली या भागात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम सुरू असून कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे जागोजागी जलवाहिन्या फुटत असतात. त्यामुळे आधीच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अनियमित पाणी पुरवठ्यामुळे वैतागलेल्या ग्रामस्थांना ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
पाणी टंचाईलाही वेळोवेळी सामोरे जावे लागत असल्याने ‘भीक नको, पण कुत्रा आवरा’ असेच म्हणायची वेळ सध्या या भागातील लोकांवर आलेली आहे. दिवसेंदिवस पाण्यासाठी लोकांची फरफट होत आहे.
आमदार दिलायला लोबो तसेच मतदारसंघातील एकूण सहाही पंचायत मंडळांच्या प्रयत्नातून आंसगाव क्रिडा प्रकल्पाच्या परिसरात नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले आहे.
परंतु या भागात मोठमोठे रहिवासी प्रकल्प तसेच तारांकीत हॉटल्स उभे रहात आहेत, ते पाहता पुढील दहा वर्षानंतरही अशीच वेळ पुन्हा बार्देशवासियांवर येणार नाही, कशावरून? असाही प्रश्न आत्ताच या भागातील लोकांना भेडसावू लागला आहे. पाणी पुरवठ्यात वाढ होत नाही. त्यामुळे नेहमीच या भागात पाणी टंचाई निर्माण होत आहे.
या भागासाठी अधिक क्षमतेने पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढील दहा वर्षांचे नियोजन करायला हवे, त्यासाठी लोकप्रतिनिधींनी नियोजन करावे, वाढत्या शहरीकरणावर निर्बंध घालायला हवे, असेही ग्रामस्थांचे मत आहे.
जलसाठ्यांचे संवर्धन करा
बार्देश तालुक्यातील नैसर्गिक जलसाठ्याचे संवर्धन करायला हवे. कायमस्वरूपी पाणी समस्या सोडविण्यासाठी जलसाठे निर्माण करावे, तसेच असलेल्या विहिरी, तळ्यांचे संवर्धन करावे, नाल्यांचे, विहिरींचे पाणी दूषित होणार नाही, याकडेही पंचायत व आमदारांना लक्ष द्यायला हवे, असेही स्थानिकांचे मत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.