साखळी: उत्तर गोव्याला पाणीपुरवठ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या केरी-सत्तरीतील अंजुणे धरणात सध्या ९५२.५ हेक्टर मीटर म्हणजेच २१.२५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा पुढील दीड ते दोन महिने पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी पुरेसा राहील, असा अंदाज धरण अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गुरुवार, ७ रोजी धरणातील पाण्याची पातळी ७५.४६ मीटर इतकी नोंदवली गेली.
गेल्यावर्षी याच कालावधीत पाण्याची पातळी ७७.१४ मीटर आणि साठा ११७७.६८ हेक्टर मीटर (२६.२७ टक्के) इतका होता. यावर्षी पाण्याची पातळी काहीशी कमी असली तरी सध्याचा साठा पुरेसा असल्याने नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जलस्रोत खात्याने राज्यातील सर्व धरणांवरील अधिकाऱ्यांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शेती, बागायती व पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक तेवढाच पुरवठा सुरू ठेवला आहे.
यंदा पावसाचे आगमन काही प्रमाणात लांबण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे जून महिन्यात पाण्याची पातळी आणखी खाली गेल्यास निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेऊन आधीच उपाययोजना आखल्या जात आहेत.
नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहनही धरण प्रशासनाने केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.