डिचोली: आमठाणे धरणाच्या मुख्य गेटची दुरुस्ती अखेर पूर्ण झाली आहे. आता साळ बंधाऱ्यातून या धरणात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत या धरणातील जलसाठा नियंत्रित व पुरेसा राहण्यास मदत होईल. आज शनिवारी सायंकाळपर्यंत या जलाशयात ४४.५ मीटर एवढा जलसाठा होता.
सध्या आमठाणे धरणात जलसाठा कमी असल्याचे दिसून येत असले तरी आवश्यकतेनुसार साळ बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात येत आहे.
जलाशय बांधल्यानंतर आतापर्यंत धरणाच्या गेटची देखभाल करण्याकडे दुर्लक्ष झाले होते. गेल्या जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातील कुडासे परिसरात तिळारीचा कालवा फुटल्यानंतर तेथून गोव्याला होणारा पाणीपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे उत्तर गोव्यात ‘पाणीबाणी’ निर्माण झाली होती.
आपत्कालीनवेळी आमठाणे धरणातील पाणी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात सोडण्याची वेळ आली तेव्हा धरणाचे गेट उघडता उघड नव्हते. जवळपास चार दिवस अथक परिश्रम केल्यानंतर ते एकदाचे उघडले, मात्र तोपर्यंत बार्देश तालुक्यातील जनतेचा घसा कोरडा पडला होता. या प्रकारानंतर जलस्रोत खात्याचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला. पुन्हा असा प्रसंग निर्माण होऊ नये यासाठी धरणाच्या मुख्य गेटची दुरुस्ती करण्यात आली आहे.
महिन्यापूर्वी आमठाणे जलाशयातील जलसाठ्यात घट होऊन पात्र कोरडे पडले होते. बरोबर महिन्यापूर्वी नऊ मीटरनी जलसाठा कमी झाला होता. तरी देखील साळ बंधाऱ्यातून या जलाशयात पाणी सोडण्यात येत नव्हते. त्यामुळे जनतेच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र गेटच्या कामासाठी धरणातील जलसाठा कमी करण्यात आल्याचे नंतर स्पष्ट झाले. सध्या आवश्यकतेनुसार साळ बंधाऱ्यातून आमठाणे जलाशयात पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जलस्रोत खात्याच्या सूत्रांकडून मिळाली. पावसाळ्यापर्यंत लोकांनी चिंता करण्याची गरज नाही, असेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.