पणजी: आझाद मैदानाजवळ निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे जाणारा काँग्रेसचा निषेध मोर्चा पोलिसांनी अडवला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
काँग्रेसचे राज्याध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले की, "राज्यात मतदार यादीत मोठ्या प्रमाणात फेक नावे आढळत आहेत. आम्ही वारंवार निवडणूक आयोगाचे लक्ष वेधत आहोत. पण कारवाई होत नाही. त्यामुळे आम्ही थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्यासाठी मोर्चा काढला होता. मात्र, पोलिसांनी आमचा मार्ग रोखला."
ते पुढे म्हणाले की, "गेल्या दोन महिन्यांपासून काल रात्रीपर्यंत गोव्यात मुख्य निवडणूक अधिकारी नव्हते. निवडणुकीच्या अगदी पार्श्वभूमीवर, काल रात्री उशिरा अचानक संजय गोयल यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती का आणि कोणाच्या दबावाखाली करण्यात आली, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत."
काँग्रेसने आरोप केला की, सांगे मतदारसंघातील भाग क्रमांक १४ मध्ये अनेक मतदारांची नोंदणी घर क्रमांक ‘०’ (शून्य) वर करण्यात आली आहे. प्रत्यक्षात असा कोणताही घर क्रमांक अस्तित्वात नसताना, अशा पद्धतीने नावे मतदार यादीत कशी आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
काल दिल्लीत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आणि निवडणूक प्रक्रियेत झालेल्या कथित गैरप्रकारांवरून इंडिया आघाडीचे नेते सोमवारी रस्त्यावर उतरले होते. संसदेपासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात २५ विरोधी पक्षांचे ३०० हून अधिक खासदार सहभागी झाले होते.
या मोर्चात काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, शिवसेनेचे संजय राऊत यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा सहभाग होता.
दिल्लीतील मोर्चा पोलिसांनी थांबवल्यानंतर काही अंतरावरच खासदारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होतं. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.