Advalpal Village Mining Dispute
डिचोली: ‘गाव उद्धवस्त होत असेल तर खाण व्यवसाय नको’, असा लोकांनी ठाम पवित्रा घेऊन संघर्ष सुरू केला असतानाही अडवलपाल गावातील एका खाणीवर उत्खनन सुरू करण्याच्या दृष्टीने हालचालींनी वेग घेतला आहे.
दुसऱ्या बाजूने खाण लीज क्षेत्रातून आमची सुटका कधी होणार, या प्रतीक्षेत असलेल्या अडवलपाल गावातील लोकांना उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातून नोटीसा बजावल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
खाण लीज क्षेत्रातून गाव बाहेर काढा, अशी मागणी असताना आणि या मुद्यावरून अडवलपाल पंचायतीच्या काही ग्रामसभा खदखदल्या असतानाही नोटीसा आल्याने संबंधित लोक अस्वस्थ झाले आहेत. सरकारने याप्रश्नी हस्तक्षेप करून आमची घरेदारे आदी मालमत्ता वाचवावी, अशी मागणी लोकांकडून होत आहे. खाण लीज क्षेत्रात अडवलपाल गावातील ३६.२२०२ हेक्टर जमीन येत आहे. दोनवेळा ग्रामसभेत खाणीचा विषय चर्चेत येऊन स्थानिकांनी खाणविरोधी भूमिका घेतली होती.
खाण व्यवसायाला विरोध केल्यामुळे १५ वर्षांपूर्वी म्हणजे २००८ साली एका खाण कंपनीकडून स्थानिक ७० लोकांविरोधात खटला दाखल सुरू आहे. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. तरीदेखील अडवलपाल पंचायत मंडळाने खाणीसाठी परस्पर ‘एनओसी’ दिली आहे. जुलैमध्ये झालेल्या अडवलपाल पंचायतीच्या ग्रामसभेत खाण कंपनीला ‘एनओसी’ दिल्याचे स्पष्ट होताच ग्रामसभा तापली होती. पंचायतीच्या या निर्णयाला लोकांनी जोरदार आक्षेप घेतला होता. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या ग्रामसभेतही ‘एनओसी’चा हा मुद्दा ऐरणीवर आला होता.
खाण व्यवसायाला आमचा विरोध नाही. मात्र, गाव उद्धवस्त होत असेल तर खाण व्यवसाय काय कामाचा? मंदिरे, जलस्रोत, शेती-बागायती खाण परिक्षेत्रातून बाहेर काढाव्यात व खाण व्यवसाय सुरू करावा, असे मत प्रेमानंद साळगावकर यांनी व्यक्त केले. या खाणीपासून सुमारे अडीज किलोमीटर अंतरावर अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्प येत आहे. उत्तर गोव्याची तहान भागवणाऱ्या या प्रकल्पाच्या भवितव्याची काळजी घेणे आवश्यक आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
खाण लीज क्षेत्रातून घरा-दारांसह शेती-बागायती आणि नैसर्गिक जलस्रोत वगळा, अशी गावातील लोकांची मागणी आहे. २४ रोजी उत्तर गोवा जिल्हाधिकारी न्यायालयात होणाऱ्या सुनावणीला उपस्थित राहून संबंधित लोकांनी म्हणणे मांडावे, अशी सूचना नोटीसीत दिली आहे. चौदा कुटुंब प्रमुख आणि त्यांच्या कायदेशीर वारसदारांना ही नोटीस बजावली आहे.
अर्जदार ‘फोमेंतो रिसोर्सिस’ कंपनीला खाण कायदा १९५७ अंतर्गत २४-ए कलमाखाली भारत सरकारच्या खाण मंत्रालयाने ५ जुलै २०२४ रोजी दिलेल्या आदेशाला अनुसरून सुनावणी निश्चित केली आहे.
उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात निश्चित केलेल्या सुनावणीवेळी हजर राहून नोटीस जारी केलेल्या संबंधितांनी आदेशाला अनुसरून आपले आक्षेप किंवा म्हणणे मांडावे.
सुनावणीस अनुपस्थित राहिल्यास पुढील नोटीस न देता विषय निकालात काढण्यात येईल.
गाव उद्धवस्त होत असेल, तर आम्हाला खाण व्यवसाय नकोच, अशी लोकांची मागणी कायम आहे. आधीच खाण व्यवसायामुळे गावातील जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे.
खाण व्यवसायामुळे अडवलपाल गावातील नैसर्गिक जलस्रोत तसेच शेती-बागायती आधीच नामशेष झाली आहेत. खाण माती घुसल्याने गेल्या १५ हून अधिक काळापासून अडवलपाल गावातील शेती-बागायती नापीक बनल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर आता पुढील ५० वर्षांसाठी खाण व्यवसाय सुरू होणार आहे. त्यामुळे केळ-अडवलपाल गावचे उरले-सुरले अस्तित्व संपुष्टात येणार, अशी स्थानिक लोकांना भीती आहे.
शिरसई-अडवलपाल खाण ब्लॉक-५ अंतर्गत येणारी कोळमवाड्याजवळील ही खाण ‘फोमेंतो रिसोर्सिस’ कंपनीच्या मालकीची आहे.
या खाणीसाठी पर्यावरणीय दाखला (ईसी) मिळाला असून, ती सुरू करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. या खाणीवर मशीनरींची धडधड सुरू झाली आहे, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.