जंगली प्राणी मानवी वस्त्यांमध्ये येतात कारण जंगलात आता त्यांच्यासाठी पुरेसे अन्न उरलेले नाही. अलीकडे उत्तर गोव्यात आढळलेल्या ओंकार नावाच्या हत्तीचे उदाहरण त्यादृष्टीने पुरेसे आहे. हे प्राणी पिके नष्ट करण्यासाठी मानवी वस्तीत येत नाहीत, तर जगण्यासाठी येतात. जंगलातील त्यांची अन्नसाखळी कोलमडल्याने त्यांना मानवी वस्त्यांमध्ये यावे लागते.
‘मानव-प्राणी संघर्ष’ या संकल्पनेऐवजी आपण आता ‘सहअस्तित्व’ या दृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक बनले आहे. त्याशिवाय वनसंवर्धनाचे धोरण आपण कधीच केवळ परिषदांमधून ठरवू नये कारण जंगलातील रहिवासी हे लाभार्थी नाहीत तर ते सहनिर्माते आहेत. त्यांच्याशिवाय कोणतंही धोरण टिकणार नाही ही बाब आपण लक्षात घ्यायला हवी.
आज शहरातील माणूस आणि वन्यजीव यांच्यातील दुरावा वाढत चालला आहे. दुर्दैवाने घोरपड, खारी, पक्षी यांसारखे जीवही आता ‘कीटक’ समजले जात आहेत. अशा परिस्थितीत जर पर्यावरण शिक्षण प्रत्येकाच्या घरातूनच सुरू झालं नाही तर टिकावूपणा किंवा शाश्वतता फक्त फॅशन बनून राहील. ती वास्तवात येणार नाही.
स्थानिक आदिवासी समाज शतकानुशतकं वन्यजीवांचं रक्षण केवळ निरीक्षण आणि परंपरागत ज्ञानाच्या आधारे करत आला आहे. आजच्या विज्ञानाने या स्थानिक ज्ञानासोबत चालणे गरजेचे आहे. लडाखमधील मेंढपाळ कुठल्याही टॅगशिवाय हिमबिबटे ओळखतात हे स्थानिक ज्ञानाचे एक चांगले उदाहरण आहे.
भारताकडे रान हक्क कायद्यासारखा मजबूत कायदा आहे, पण त्याची अंमलबजावणी स्थानिक संस्कृतीशी सुसंगत असली पाहिजे. आपलं धोरण लोकांसोबत तयार झालं, तरच निसर्ग खरा टिकेल.
(‘कलेद्वारे जंगल विज्ञान संवाद’ या विषयावर झालेल्या ‘मोग सन्डे’ व्याख्यानातून)
डॉ. पुरबी बोस
पर्यावरण संशोधक आणि रॉयल स्वीडिश अकॅडमी फेलो
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.