शणै गोंयबाब हे केवळ एक साहित्यिक किंवा भाषातज्ज्ञ नव्हते, तर ते गोमंतकीय समाजाच्या आत्मजागृतीचे प्रणेते होते. त्यांनी कोकणी भाषेला प्रतिष्ठा मिळवून दिली, समाजसुधारणेचा संदेश दिला आणि गोव्याच्या सांस्कृतिक अस्मितेचे रक्षण केले.
आज पासून गोमंतकीय नवजागरणाचे जनक शणै गोंयबाब यांचे १५०वे जयंती वर्ष (२३जून २०२६-२३ जून २०२७) सुरू होत आहे. गोव्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि भाषिक इतिहासात शणै गोंयबाब यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे. त्यांनी गोमंतकीय समाजात आत्मभान जागृत केले, कोंकणी भाषेच्या जतनासाठी आयुष्यभर संघर्ष केला आणि समाजसुधारणेचे कार्य हाती घेतले. त्यामुळे त्यांना ‘गोमंतकीय नवजागरणाचे जनक’ तसेच ‘कोकणी भाषेचे जनक’ म्हणून गौरविण्यात येते.
शणै गोंयबाब यांचे मूळ नाव वामन रघुनाथ रघुनाथ राव वर्दे वालावलीकर असे होते. त्यांचा जन्म २३ एप्रिल १८७७ रोजी गोव्यातील डिचोली येथे झाला. त्या काळात गोवा पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. शिक्षण, संस्कृती आणि भाषा यांवर परकीय प्रभाव वाढत असताना गोमंतकीय समाज स्वतःच्या ओळखीपासून दूर जात होता. अशा परिस्थितीत गोयंबाबांनी आपल्या समाजाला त्याच्या सांस्कृतिक मुळांची जाणीव करून देण्याचे कार्य सुरू केले.
शणै गोंयबाब यांचे सर्वांत मोठे कार्य म्हणजे कोकणी भाषेच्या जतनासाठी केलेला संघर्ष. मुळातच कोकणी ही भाषा हे सिध्द करण्यासाठी त्यांनी केलेला आटापिटा. या प्रयत्नांना धारदार संशोधन व अभ्यासाचा पाया होता. त्या काळात अनेक सुशिक्षित लोक कोकणी भाषेकडे तुच्छतेने पाहत होते. ते मराठी किंवा पोर्तुगीज भाषेला अधिक महत्त्व देत होते.
अशा वेळी गोंयबाबांनी कोकणी ही गोमंतकीय जनतेची मातृभाषा असून तिच्या संवर्धनाशिवाय गोव्याची सांस्कृतिक ओळख टिकू शकत नाही, कोकणीशी प्रतारणा करू नका, असे विचार ठामपणे मांडले. शणै गोंयबाब हे बहुआयामी लेखक होते. त्यांनी कोकणी भाषेचे व्याकरण, शब्दसंपदा, इतिहास आणि साहित्य यांचा अभ्यास करून अनेक लेख व पुस्तके लिहिली.
त्यांनी इतिहास, धर्म, संस्कृती, लोकपरंपरा, भाषा, समाजसुधारणा आणि शिक्षण अशा विविध विषयांवर विपुल लेखन केले. त्यांच्या लेखनात संशोधनाची दृष्टी, तर्कशुद्ध विचार आणि समाजहिताची भावना दिसून येते. त्यांच्या साहित्याचा मुख्य उद्देश समाजाला जागृत करणे हा होता. त्यांनी गोव्याच्या इतिहासाचा अभ्यास करून लोकांना त्यांच्या गौरवशाली परंपरेची जाणीव करून दिली. तसेच त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर चिकित्सक दृष्टीने विचार मांडले.
त्यांच्या लेखनामुळे कोकणी भाषेला नवे बळ मिळाले आणि तिच्या विकासाची चळवळ सुरू झाली. कोकणी इमारतीचा पाया त्यांनी रचला. त्यांनी कोकणीत नाटके अनुवादित केली. ती मंचीत होऊ लागली. कोकणीतूनही नाटके व्हावीत, भाषा स्वयंसिध्द आहे यासाठाची त्यांचा हा खटाटोप यशस्वी झाला. शणै गोंयबाब हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते एक प्रभावी समाजसुधारकही होते.
समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद, सामाजिक विषमता आणि अज्ञान यांविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. शिक्षणाचा प्रसार, स्त्रियांचे सक्षमीकरण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांना त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांच्या मते समाजाची प्रगती ही शिक्षण आणि जनजागृतीवर अवलंबून असते. त्यामुळे त्यांनी लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आणि सामाजिक प्रश्नांवर विचारमंथन घडवून आणण्यासाठी सतत प्रयत्न केले.
पोर्तुगीज राजवटीच्या काळात गोव्याच्या सांस्कृतिक ओळखीवर अनेक प्रकारचे दबाव होते. गोंयबाबांनी गोमंतकीय संस्कृती, परंपरा आणि भाषा यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी लोकांना आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगण्यास आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यास प्रेरित केले. त्यांच्या कार्यामुळे गोमंतकीय समाजात स्वाभिमानाची भावना निर्माण झाली. पुढील काळातील सांस्कृतिक आणि भाषिक चळवळींना त्यांच्या विचारांमधून प्रेरणा मिळाली.
शणै गोंयबाब यांचे निधन ९ एप्रिल १९४६ रोजी मुंबई येथे झाले. परंतु त्यांचे विचार आणि कार्य आजही जिवंत आहेत. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि जगभरातील कोकणी भाषिक समाज त्यांना आदराने स्मरतो. त्यांच्या स्मरणार्थ विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने आणि साहित्यिक उपक्रम आयोजित केले जातात.
शणै गोंयबाब हे केवळ एक साहित्यिक किंवा भाषातज्ज्ञ नव्हते, तर ते गोमंतकीय समाजाच्या आत्मजागृतीचे प्रणेते होते. त्यांनी कोकणी भाषेला प्रतिष्ठा मिळवून दिली, समाजसुधारणेचा संदेश दिला आणि गोव्याच्या सांस्कृतिक अस्मितेचे रक्षण केले. त्यांचे जीवन कार्य, त्याग आणि दूरदृष्टी हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे. कोंकणी भाषा आणि गोमंतकीय संस्कृती जोपर्यंत अस्तित्वात राहील, तोपर्यंत शणै गोंयबाब यांचे नाव आदराने घेतले जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.