पाठ्यपुस्तकाचे (दप्तराचे) ओझे हा अनेक वर्षे चर्चेचा विषय राहिला आहे. गेल्या पन्नास वर्षात विविध समितीनी यासंबंधी काम केले आहे. ईश्वरभाई पटेल कमिटी (१९७७), एनसीआरटी वर्किंग ग्रुप (१९८४), राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (१९८६), राष्ट्रीय शैक्षणिक धोरण रिव्ह्यू कमिटी (१९९०) त्याचबरोबर १९९२ मध्ये भारत सरकारने प्राध्यापक यशपाल यांच्या नेतृत्वाखाली ८ सदस्यांची समिती नेमली होती.
अर्थात केवळ ‘दप्तराचे ओझे’ हा विषय त्यावेळी नव्हता. गेल्या पंचवीस-तीस वर्षात शिक्षणाच्या संदर्भात आपल्या देशामध्ये विविध प्रयोग आणि संशोधन चालू आहे. त्यामध्ये आनंददायी शिक्षण, भयमुक्त शिक्षण, कृती आधारित शिक्षण, ओझ्याविना शिक्षण या संकल्पनांचा विचार केला गेला आहे. शिक्षकांनाही या संबंधात प्रशिक्षण दिले जात आहे.
मुलांच्या पाठीवर दप्तराचे आणि डोक्यावर अभ्यासाचे ओझे का वाढते आहे हा विचार करण्याजोगा विषय आहे. शिक्षक अनेकदा शिकवताना पाठ्यपुस्तकाचा आधार घेतात. शिक्षकांनी खरे तर अभ्यासक्रम (सिलेबस) शिकवायचा असतो पण या संबंधात शिक्षकांना प्रशिक्षण दिले गेलेले नसते. परीक्षा पद्धतीमुळेही विद्यार्थ्यांवर ओझे येते.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (कंटिन्यूअस कॉम्प्रिहेंन्सिव्ह इव्हेल्युएशन) या संदर्भातही शिक्षकांचे हवे तसे प्रशिक्षण झालेले नाही. विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या दृष्टीने महत्वाची असलेली परीक्षेतील टक्केवारी आणि स्पर्धा यामुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यावर ताण असतो आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे परकीय भाषेतून शिक्षण घेतल्याने हा ताण अधिकच वाढत असतो. हे देखील एक ओझेच आहे.
दप्तराचे ओझे हे शारीरिक ओझे आहे तर मी नमूद केलेली वरील इतर ओझी ही मेंदूवर ताण आणणारी ओझी आहेत. अलीकडच्या काळात दप्तराचे ओझे हा चर्चेचा तसेच कोर्टाच्या निकालाचा विषय बनला आहे. त्यासंदर्भात अनेक शासकीय पत्रके व सूचना येत असतात. मात्र या सूचनांचे पालन केले जात नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यामध्ये ६वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षातून १० दिवस दप्तरावीना शाळा असावी अशी सूचना आहे. यासंदर्भातही शिक्षकांचे प्रशिक्षण आवश्यक आहे.
दप्तराचे ओझे का होते? तर अनेकदा विद्यार्थी पाठ्यपुस्तकांबरोबर गाईड्स, डायजेस्ट हे देखील शाळेत घेऊन जातात. अनेकदा वेळापत्रकांना अनुसरून पुस्तके शाळेत नेली जात नाहीत. शिक्षक गैरहजर असताना वर्गात आलेला पर्यायी शिक्षक स्वतःचाच विषय शिकवणे पसंत करतो त्यामुळे दर दिवशी वेळापत्रकात नसलेल्या विषयांची पुस्तके घेऊन यावीत असेही दडपण विद्यार्थ्यांवर असते.
शिक्षकांनी वेळापत्रकाप्रमाणे शिकवले पाहिजे. पर्यायी शिक्षकांनी आपला विषय पाठ्यपुस्तकाविना कसा शिकवता येईल याचा विचार केला पाहिजे. शिक्षकांनी गृहपाठाचे नियोजन करावे लागेल म्हणजे गृहपाठाच्या वह्या दररोज नेण्याची विद्यार्थ्याला गरज राहणार नाही. अलीकडे शासनातर्फे दरवर्षी पाठ्यपुस्तके पुरवली जातात. त्यातून अनेक शाळा विद्यार्थ्यांना जुना संच घरी ठेवावा, नवीन संच शाळेत वापरावा अशा सूचना देतात. (मात्र यात एक त्रुटी आहे- जुन्या पाठ्यपुस्तकांचा वापर विद्यार्थ्यांनी केलेला असतो, त्यावर त्यांच्या नोंदी असतात. विद्यार्थ्यांनी खरे तर अभ्यास करून स्वतःच्या नोंदी नोंदवल्या पाहिजेत.) दप्तरांचे (तसेच शिक्षणाचे मानसिक) ओझे ही खरे तर चिंतेचीच बाब आहे. मात्र नियोजनपूर्वक ते कमी करता येणे शक्य आहे.
- प्रा. पांडुरंग नाडकर्णी, शिक्षणतज्ज्ञ
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.