दिल्लीतील एक दुपार. हलक्या सरी पडत होत्या. नेहमी गजबजलेला साउथ ब्लॉक त्या दिवशी काहीसा शांत, विचारवंतासारखा भासत होता. एका अत्यंत महत्त्वाच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर आम्ही बाहेर पडलो. समोरच्या बाजूला अशोकसर उभे होते. त्यांनी सहजतेने छत्री उघडली आणि मला त्याखाली बोलावले. मी जावे की, न जावे या संभ्रमात होतो.
त्याच अवस्थेत धावत त्यांच्यापाशी पोहोचलो. तसाच अर्धा छत्रीच्या अर्धा छत्रीच्या बाहेर संकोचलो. नेमका त्या क्षणाचा एक फोटो एका माध्यमकर्मींनी टिपला. आमच्या मागे त्या वेळी संरक्षणमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन मॅडम त्यांचा चमू घेऊन चालल्या होत्या. पण त्या क्षणी, त्या फोटोमध्ये फक्त आम्ही होतो. मी, अशोकसर आणि मंद कोसळणाऱ्या पावसाच्या सरी! हा क्षण माझ्या स्मरणात कायमचा कोरला गेला. फक्त पावसामुळे नव्हे, तर त्या एका चित्रात आमच्या नात्याची पूर्ण कहाणी सामावलेली होती.
२०१४ ते २०१९या कालावधीत दिल्लीतील आमच्या वास्तव्यात मी केवळ त्यांचा ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ (ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी) नव्हतो; मी त्यांच्या कुटुंबातील सदस्यही होतो. आणि जसं त्या फोटोमध्ये मी त्यांच्या छत्रीच्या सावलीत होतो, तसंच त्या काळात मी त्यांच्या प्रेमाच्या, सुसंस्कारांच्या आणि करुणेच्या सावलीत सावरलो होतो.
अशोकसर यांनी कधी कुणाला लहान समजले नाही. त्यांचा सहानुभूतीशील स्वभाव, मोजके पण नेहमी हृदयाला भिडणारे बोलणे, कोणालाही दुखावल्याशिवाय केलेले मार्गदर्शन, हे त्यांच्या नेतृत्वाचे खरे गुणविशेष होते. ते कधीच अधिकार गाजवत नाहीत, ते प्रेरणा देतात. कधीच सक्ती करत नाहीत, पण हृदयपरिवर्तन घडवतात. त्यांच्या सहवासात राहणं म्हणजे विनम्रतेच्या आणि संयमाच्या चालत्याबोलत्या विद्यापीठात शिक्षण घेणे.
अशोकसर यांच्यासोबत तीन दशकेघालवणे हे फक्त निष्ठेचेच नव्हे, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर असलेल्या नितांत श्रद्धेचेही प्रतीक आहे. ते म्हणजे प्रतिष्ठेच्या शिखरावर राहूनही साधेपण कसे जपावे, याचा वस्तुपाठ आहेत.
अलीकडेच त्यांनी सिंहाचलम अप्पण्णा स्वामी मंदिरातून बाहेर पडल्यानंतर, आपल्या राजकीय आयुष्यातील सर्वांत क्लेशदायक निर्णय घेतला, तो होता तेलगू देसम पक्षातून बाहेर पडण्याचा. त्यावेळी माध्यमांसमोर ते म्हणाले, ‘पदव्यांमुळे अहंकार वाढू नये म्हणून मी देवाकडे प्रार्थना केली. मला नम्रतेचा वर मिळावा, हीच मी त्याच्याकडे मागणी केली’. त्यांनी आपल्या आयुष्याचे सार सांगितले.
त्यांचे आयुष्य हे कधीच सवलतींच्या मागे धावणारे नव्हते, जरी त्या सहज उपलब्ध होत्या. मी स्वतः पाहिलेय, नागरी विमान वाहतूक मंत्री असतानाही त्यांनी आलिशान हॉटेल्सऐवजी विमानतळांच्या विश्रांतीगृहात किंवा शासकीय विश्रामगृहात थांबणे पसंत केले; मग ते चेन्नई असो वा कोलकाता.
हैदराबाद स्थानकावर पत्नीसमवेत प्लॅटफॉर्मवर सहजतेने बसलेले त्यांचे एक छायाचित्र व्हायरल झाले होते. १० लाखांहून अधिक लोकांनी ते पाहिले. हा कुठल्याही प्रकारचा कुणाकरवी करून घेतलेला प्रचार नव्हता. एक साध्या सहृदय माणसाचे सहज घडलेले ते दर्शन होते.
१७ वर्षे मंत्रिपद, ७ वेळा आमदारकी, एकदा खासदार म्हणून निवडून आलेली आणि राजघराण्यातून आलेली व्यक्ती इतकी विनम्र असू शकते, यावर विश्वास बसणे कठीण आहे. पण खरेच, साधेपण हेच खरे सौंदर्य असते, याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. आता गोवा, आपले २०वे राज्यपाल म्हणून अशोक गजपती राजूंचे स्वागत आज करत आहे. गोव्यास केवळ एक घटनात्मक प्रमुखच नव्हे, तर त्यांच्या रूपात एक सच्चा, समर्पित नागरिक लाभला आहे.
अशोकसरांसोबत चालणे म्हणजे केवळ एका नेत्यासोबत प्रवास करणे नव्हे, तर एका शहाणपणाच्या, करुणेच्या आणि नम्रतेच्या प्रवाहात वाहत जाणे आहे. मी केवळ त्यांची सेवा केली नाही मी त्यांच्या सावलीत विसावलो; त्यांच्या करुणेच्या पावसात आणि जीवनातही चिंब झालो.
आयुष्याचे प्रतिबिंब ठरावे असे क्षण आयुष्यात फार दुर्मीळ असतात. ते धरून ठेवता येत नसतीलही; पण ते मनाच्या गाभाऱ्यात तसेच राहतात. प्रखर उन्हात सावली देतात, पावसात छत्र होतात. दिल्लीतील तो एक शांत, शीतल क्षण तसाच रेंगाळला आहे. आजही आयुष्य समृद्ध करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.