India Silent Cholesterol Crisis: भारतातील प्रौढ नागरिकांमध्ये हृदयविकाराचा धोका अत्यंत वेगाने वाढत असल्याचा धक्कादायक खुलासा एका मोठ्या देशव्यापी संशोधनातून झाला. 'आयसीएमआर-इंडियाब' (ICMR-INDIAB) या देशातील सर्वात मोठ्या आरोग्य सर्वेक्षणांतर्गत 23,665 लोकांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. या अभ्यासानुसार, भारतातील दर 10 पैकी तब्बल 9 प्रौढ व्यक्तींच्या रक्तातील लिपिड म्हणजेच कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराइड्सची पातळी बिघडलेली आढळली.
वैद्यकीय भाषेत या आजाराला 'डिस्लिपिडेमिया' म्हणतात. सुरुवातीला याची कोणतीही लक्षणे दिसत नसल्यामुळे, हा आजार शरीरात गुपचूप पसरणारा 'सायलेन्ट किलर' ठरत आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी जेव्हा अनियंत्रित होते, तेव्हा त्याचा थेट परिणाम शरीरावर लगेच जाणवत नाही. मात्र, यामुळे रक्तवाहिन्यांच्या आत हळहळू फॅटचे थर जमा होऊ लागतात. कालांतराने हे थर इतके वाढतात की ते रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतात किंवा फुटतात. परिणामी, व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोक येण्याचा धोका निर्माण होतो.
या अभ्यासात सर्वात महत्त्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे, शरीरासाठी चांगले मानले जाणारे एचडीएल म्हणजेच 'गुड कोलेस्ट्रॉल' कमी असण्याचे प्रमाण तब्बल 66.8 टक्के लोकांमध्ये आढळले. याशिवाय, सुमारे 49.4 टक्के लोकांमध्ये एलडीएल म्हणजेच 'बॅड कोलेस्टेरॉल'चे प्रमाण जास्त होते, तर 29.5 टक्के लोकांमध्ये ट्रायग्लिसराइड्सची पातळी जास्त वाढलेली दिसून आली.
हा आजार प्रामुख्याने महिला, शहरी भागातील रहिवासी आणि मध्य भारतातील लोकांमध्ये अधिक प्रमाणात आढळला. ज्या लोकांना आधीपासूनच मधुमेह, लठ्ठपणा किंवा उच्च रक्तदाब आहे, त्यांच्यामध्ये तर हा धोका प्रचंड जास्त आहे. भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास, मध्य भारतात याचे प्रमाण सर्वाधिक (89.1 टक्के) आहे, तर ईशान्य भारतात हे प्रमाण सर्वात कमी (85.3 टक्के) आहे. परंतु, सर्वात कमी प्रमाण असलेल्या भागातही दर 10 पैकी 8 जणांचे कोलेस्ट्रॉल बिघडलेले आहे, ज्यावरुन हा आजार देशभर किती पसरला हे स्पष्ट होते.
आजकाल वयाच्या विशी-तिशीमध्येच लोकांमध्ये हे कोलेस्ट्रॉलचे असंतुलन सुरु होत असल्याचे संशोधकांनी सांगितले. त्यामुळे भविष्यातील गंभीर हृदयविकार टाळण्यासाठी प्रत्येकाने नियमितपणे 'लिपिड प्रोफाईल टेस्ट' करणे आवश्यक आहे, विशेषतः ज्यांना मधुमेह किंवा लठ्ठपणा आहे त्यांनी वेळीच सावध व्हावे. योग्यवेळी निदान, सकस आहार, नियमित व्यायाम आणि गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेली औषधे यामुळे हा धोका सहज टाळता येऊ शकतो, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.