भारताच्या लष्करी कारवाईने बिथरलेल्या पाकिस्तानने जम्मूसह पठाणकोट एअरबेस ड्रोन हल्ला केला. स्फोटाचा आवाज ऐकू आल्यानंतर हवाई सायरन वाजवण्यात आले. पाकिस्तानच्या या नापाक हल्ल्यानंतर संपूर्ण जम्मूमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. लोकांना त्यांच्या घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, जम्मूच्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ब्लॅकआउट लागू करण्यात आला. स्फोटाच्या आवाजानंतर जम्मूमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली. जम्मूमध्ये 5-6 स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, आकाशात ड्रोन दिसल्यानंतर जम्मूमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, अमृतसरसह अनेक ठिकाणी पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले. जम्मूनंतर काश्मीरच्या कुपवाडामध्येही गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानी ड्रोन पाडले. भारताने पाकिस्तानचा हल्ला हाणून पाडला. भारताच्या एस-400 ने पाकिस्तानची 8 क्षेपणास्त्रे पाडली.
पाकिस्तान (Pakistan) पंजाबमधील त्या शहरांना लक्ष्य करत आहे, जिथे लष्करी छावण्या आणि हवाई तळ आहेत. हेच कारण आहे की, बुधवार-गुरुवार रात्री पाकिस्तानने पंजाबमधील सात शहरांना लक्ष्य केले, परंतु भारतीय सैन्याने त्यांचे मनसुबे उधळून लावत क्षेपणास्त्र हल्ले निष्क्रिय केले. पठाणकोटही पाकिस्तानच्या निशाण्यावर होते. पठाणकोटमध्ये भारतीय हवाई दलाचा तळ आहे. यामुळेच पाकिस्तानी सैन्याने पठाणकोट या सीमावर्ती जिल्ह्यालाही लक्ष्य केले. याआधी 2016 मध्येही पठाणकोट एअरबेसवर दहशतवादी हल्ला झाला होता. रात्री उशिरा झालेल्या स्फोटांमुळे पठाणकोट एअरबेसवर पुन्हा एकदा असाच हल्ला झाल्याचे वाटत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. या हल्ल्यात भारतीय लष्कर आणि हवाई दलाचे अनेक जवान शहीद झाले.
पठाणकोट एअरबेस स्टेशनजवळील नौशेरा नलबांडा गावातील लोकांना रात्री उशिरा स्फोटाचा आवाज ऐकू आला. गुरुवारी (8 मे) सकाळी पोलिस विभागाकडून शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र, पोलिसांना अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. नौशेरा नालाबांडा गावाचे सरपंच सुखजिंदर सिंग यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी 5:15 वाजता त्यांना स्फोटाचा आवाज ऐकू आला. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा असे वाटले की जणू काही ड्रोन हल्ला झाला आहे. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस आणि लष्कराने शोध मोहीम सुरु केली.
पठाणकोटमध्ये भारतीय लष्कराची (Indian Army) एक छावणी देखील आहे. संपूर्ण पठाणकोट जिल्हा लष्करी छावणीने वेढलेला आहे. पठाणकोट एअरबेस, मामून कँट, माधोपूर, बाम्याल, चक्की पुल, नांगल भूर, बडोली कलान आणि धारकलन येथे लष्कराच्या छावण्या आहेत. जम्मू-काश्मीरच्या बाजूने पठाणकोटला आंतरराष्ट्रीय सीमा देखील आहे. हेच कारण होते की, शत्रू देशाने पठाणकोट एअरबेससह लष्करी छावणीवर हल्ला करण्याची योजना आखली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.