Cloud Burst In Chasoti: उत्तर भारतात पावसाने कहर केला आहे. पर्वतीय भागांतून ढगफुटी आणि पूर आल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. ताजी घटना जम्मू विभागातील किश्तवाड जिल्ह्यातून समोर आली आहे. किश्तवाडमधील पाडर परिसरातील चसोती गावात ढगफुटी झाली. या दुर्घटनेत 10 लोकांचा मृत्यू झाला असून बचाव कार्य अजूनही सुरु आहे. ढगफुटीमुळे परिसरातील नद्या आणि नाल्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे, ज्यामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी या घटनेची माहिती सोशल मीडियावरुन दिली. त्यांनी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, "आत्ताच जम्मू-काश्मीरचे (Jammu and Kashmir) विरोधी पक्षनेते आणि स्थानिक आमदार श्री सुनील कुमार शर्मा यांच्याकडून आम्हाला पाडरच्या चसोती भागात ढगफुटी झाल्याची माहिती मिळाली. आम्ही किश्तवाडचे उपायुक्त श्री पंकज कुमार शर्मा यांच्याशी चर्चा केली आहे. प्रशासन तात्काळ कामाला लागले असून, बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे आणि आवश्यक बचाव व वैद्यकीय सुविधांची व्यवस्था केली जात आहे. माझे कार्यालय सातत्याने अपडेट घेत असून, शक्य ती सर्व मदत पुरवली जाईल."
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मचैल माता यात्रेच्या मार्गावरील चसोती या दुर्गम गावात ढगफुटी झाल्यामुळे 10 जणांच्या मृत्यूची भीती आहे. चसोती हे मंदिर मार्गावरील शेवटचे गाव आहे. या गावात यात्रेकरुंसाठी पार्किंगची व्यवस्था आणि लंगर (मोफत भोजन) लावण्यात येते. येथून पुढे यात्रेकरुंना 30 किलोमीटरची पदयात्रा करावी लागते. ढगफुटीच्या वेळी येथे मोठी गर्दी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे वार्षिक मचैल माता यात्रा स्थगित करण्यात आली असून, अधिकारी सर्व संसाधनांसह बचाव आणि मदत कार्यासाठी घटनास्थळी रवाना झाले आहेत.
अनेक गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झाले आहे. प्रशासनाच्या पथकांनी गावोगावी जाऊन लोकांना नद्या आणि पाण्याच्या प्रवाहापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. या घटनेच्या चार दिवसांपूर्वीही पाडरमध्ये ढगफुटी झाली होती, ज्यामुळे चिनाब नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे नद्या (Rivers) दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने डोंगराळ भागातील लोकांना सुरक्षित राहण्याचा आणि नदीच्या जवळ न जाण्याचा इशारा दिला आहे.
उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी 'X' वर लिहिले की, "किश्तवाडमधील चसोती येथील ढगफुटीच्या घटनेने व्यथित झालो आहे. पीडित कुटुंबांप्रती माझ्या संवेदना आहेत आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. नागरी, पोलीस, लष्कर, एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) आणि एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद दल) यांना बचाव आणि मदत कार्य अधिक वेगाने करण्याचा आणि बाधितांना शक्य ती सर्व मदत देण्याचे निर्देश दिले आहेत."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.