भारत आणि पाकिस्तान या दोन शेजाऱ्यांमधील क्रिकेटचा सामना नेहमीच ‘हाय व्होल्टेज’ ठरतो. प्रेक्षकांच्या भावना, उत्साह, जोश आणि तणावाचा स्तर अनेक पटीनं वाढतो. मात्र यंदाचा आशिया कप 2025 मधील भारत-पाकिस्तान सामना फक्त क्रीडाप्रेमींनाच नव्हे, तर राजकीय स्तरावर आणि सामाजिक पातळीवरही वाद निर्माण करत आहे.
एप्रिल महिन्यात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली होती. त्या हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता. हल्लेखोरांनी लोकांचा धर्म विचारून गोळ्या झाडल्या, असा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर भारतानं पाकिस्तानवर सर्व प्रकारे बहिष्कार टाकण्याची घोषणा केली.
ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं, सिंधू पाणी करार रद्द करण्यात आला आणि भारतानं पाकिस्तानसोबत कोणत्याही क्षेत्रात सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी देशातील सर्वसामान्य नागरिक ते राजकीय पक्ष सर्वांनी सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला होता.
मात्र आता आशिया कपच्या वेळेस पुन्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना खेळवण्याचा निर्णय झाल्याने विरोधकांनी तसेच काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. आज दुबईमध्ये खेळला जाणारा भारत-पाकिस्तान टी-20 सामना हा वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. अनेक राजकीय नेते, सामाजिक संघटना आणि नागरिक या सामन्याच्या विरोधात आवाज उठवत आहेत. सोशल मीडियावर तर #BoycottINDvPAK हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे.
याउलट, सरकारमधील काही नेते आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटशी संबंधित मंडळी सामना होण्याच्या बाजूने ठाम आहेत. त्यांचं म्हणणं आहे की खेळ हा राजकारणापासून वेगळा ठेवावा. विरोधकांच्या आरोपांवर त्यांनी जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे.
दरम्यान, देशात दोन वेगवेगळं चित्र दिसत आहे. काही भागांत आंदोलन, निदर्शनं आणि बहिष्काराची घोषणाबाजी होत आहे, तर दुसरीकडे क्रीडाप्रेमी टीम इंडियाच्या विजयासाठी देवळात पूजा-अर्चना, हवन-यज्ञ आयोजित करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.