Earth Day Dainik Gomantak
ब्लॉग

"पृथ्वीचे सौंदर्य तीला पुन्हा प्राप्त करून देऊया ही धरती हिरवीगार करूया..."

दैनिक गोमन्तक

वाढते प्रदूषण तसेच अयोग्य मानवी जीवनशैलीचे दुष्परिणाम जाणवू लागल्यामुळे 1990 पासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर वसुंधरा दिन साजरा केला जाऊ लागला. माणूस केंद्रस्थानी मानून, समाजामध्ये पर्यावरण विषयक जनजागृती करणे,. तसेच निसर्ग, पर्यावरण व मानव यांचे परस्परावलंबित्व आणि सहकार्य सुदृढ करणे हे ‘वसुंधरा दिन’ साजरा करण्यामागचा मुख्य प्रयोजन आहे.

आपण ज्या पृथ्वीवर राहिलोय तिचा संस्कृत भाषेत व्यक्त होणारा महिमा विनोबा भावे यांनी यथार्थपणे सांगितला आहे- 'पृथ्वी म्हणजे पसरलेली, ‘धरा’ म्हणजे धारण करणारी, ‘गुर्वी’ म्हणजे वजनदार, ‘उर्वी’ म्हणजे विशाल, ‘क्षमा’ म्हणजे सहन करणारी' अशी ही बहुगुणी संपन्न पृथ्वी.

आपले पूर्वज चार कोटी वर्षांपूर्वी या पृथ्वीवर दाखल झाले आणि माणूस दहा हजार वर्षांपूर्वी शेती करायला लागला असा आपला हा इतिहास आहे. समस्त मानव प्राण्याचं घर असलेल्या पृथ्वीची म्हणजे वसुंधरेची वर्तमान अवस्था कशी आहे याचा गंभीरपणे विचार करायची वेळ आली आहे. पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्राची प्रत्येक गरज पृथ्वी भागवू शकते पण हाव मात्र नाही अशा आशयाचे उद्गार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी उगाच नाही काढले.

गरिबांसाठी निसर्ग हे एकमेव भांडवल असतं. अन्न, औषध, इंधन व रोजगार म्हणजेच संपूर्ण जीवन हे जंगल अथवा समुद्र या पर्यावरणीय अवस्थेवर त्यांचे जीवन अवलंबून आहे. पण विकास की पर्यावरण अशा चक्रात सापडलेला माणूस विकासाला अधिक प्राधान्य देताना दिसतो आहे. त्यामुळे पर्यावरण विनाश हाच त्याचा चालू वर्तमान काळ बनला आहे. जंगल विनाश, मातीचा विनाश, नैसर्गिक जलसाठ्यांचा, जंगली प्राण्यांचा विनाश, अति लोकसंख्या व विषमता या कारणांमुळे पृथ्वीवरील पर्यावरणीय विनाश अधिकच भयाण व गडद होत चालला आह

‘हवामान बदल’ हीच आज जागतिक चिंता बनली आहे. पृथ्वीचे तापमान सतत वाढत आहे. हवामान बदलामुळे मान्सून क्षीण झाला आहे, सूर्य आग ओकू लागला आहे. समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन वाढलं, माती क्षारयुक्त झाली, पाऊस बिनभरवशाचा झाल्यामुळे ओला दुष्काळ, सुका दुष्काळ असली नैसर्गिक संकटे नित्याचीच होऊन बसली आहेत. नद्यांना सतत येणाऱ्या पुरामुळे, अवकाळी पावसाळ्यामुळे शेती धोक्यात आली आहे. नद्यांनी पात्र बदलल्यामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. वाढती लोकसंख्या आणि पिण्याच्या पाण्याची समस्या ही चिंतेची बाब बनत चालली आहे. आजच्या घडीला जगातील पाच माणसांमध्ये एका माणसाला तहान भागवता येत नाही. जलतज्ज्ञांच्यामते 2030 साली दर तीन माणसांमागे एकाला जलताण सहन करावा लागणार आहे. 2050 सालापर्यंत जगाच्या लोकसंख्येत तीनशे कोटींची ज्यादा भर पडणार आहे असा लोकसंख्या विश्लेषकांचा अंदाज आहे.

गोव्यातदेखील सध्या नदीतून होणाऱ्या बेसुमार रेतीउपसा तसेच खनिज उत्खनन यामुळे पर्यावरण संबंधित गंभीर समस्या उद्भवल्या आहेत. गोव्यातील म्हादई अभयारण्यातील वाघांचे नैसर्गिक अधिवास नाहीसे करून तो परिसर पर्यटनयुक्त करण्याचे प्रयत्न शासकीय पातळीवर सुरू झाले आहेत. स्पष्टच सांगायचं झालं तर माणसानं वसुंधरेच्या विरोधात विनाशकारी युद्धच पुकारले आहे. प्रक्षुब्ध वसुंधराही या ना त्या रूपाने त्याला 'रिटर्न गिफ्ट' पाठवतच आहे. २०२० मध्ये नव्यानेच उद्भवलेल्या कोरोना विषाणूने जगाला हादरवून सोडले. निसर्गाचा अतिरेकी विनाश करणाऱ्या माणसाला वसुंधरेने दिलेली ही शिक्षा तर नव्हे? माणसाने सावध होऊन तिच्या हाका ऐकायची वेळ आली आहे.

- नारायण महाले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

विजयनगर साम्राज्य, गोव्याचा संदर्भ; मदुराई आणि कुमार कंपण्णांचा इतिहास याबद्दल जाणून घ्या

Top Most Polluted Countries: जगातील 'हे' 8 देश सर्वाधिक प्रदूषित; क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर!

Goa Politics: दिल्लीत नेमके 'काय' घडले? 'कुणाला' समज, 'कुणाला' आदेश..

SCROLL FOR NEXT