हरमल: पंचायत क्षेत्रातील प्रभाग ४ मधील गिरकरवाडा व दांडो भागातील तात्पुरत्या पंधरा बांधकामांपैकी शिल्लक ३ बांधकामे गुरुवार, ६ रोजी जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी गटविकास खात्याचे भिवा ठाकूर व अन्य उपस्थित होते.
गिरकरवाडा भागातील बहुचर्चित प्रकरणातील २१६ बांधकामांपैकी तीन दिवसांत १५ बांधकामे जमीनदोस्त केल्याचे पंचायत सचिव सुभाष कांबळी यांनी माहिती दिली. यावेळी काहींनी आपली बांधकामे स्वतःहून हटविली असल्याचे त्यांनी सांगितले. जमीनदोस्त करण्याच्या प्रक्रियेस कोणीही हरकत घेतली नाही, त्यांना आवश्यक नोटीस दिली होती. मात्र, अनेकांनी न्यायालयात आव्हान दिल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. यावेळी गटविकास खात्यातर्फे अधिकारी भिवा ठाकूर, अभियंता फटू शेटगावकर व पंचायत कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, त्या भागातील एक विहीर बुजवण्यात आल्याने कित्येकांनी संताप व्यक्त केला. त्या विहिरीचे पाणी अनेक कुटुंबे वापरत होती. मात्र पाणीटंचाईच्या काळात या भागातील कुटुंबांना वणवण भटकावे लागण्याची शक्यता असून, सरकार जाणूनबुजून कुकर्म करीत असल्याची प्रतिक्रया एका वयस्कर महिलेने दिली.
प्राप्त माहितीनुसार, बांधकामे जमीनदोस्त केल्यानंतर मालकांनी निराशा व्यक्त केले. स्थानिक व्यावसायिकांचा छळ चालविला असून, चरितार्थासाठी साधन निर्माण करणे गुन्हा असल्यास परप्रांतीय लोकांच्या बांधकाम व व्यवसायाला अभय का दिले जाते, असा सवाल उपस्थित केला. न्यायालय व गटविकास खात्याने दिलेल्या आदेशानुसार कारवाई सुरू केली असली तरी मानवी दृष्टिकोनातून कारवाईत पक्षपातीपणा होत असल्याचे काहींनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.