
पणजी: मधुमेहाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामागे जेवणातील अनियमितपणा, शारीरिक व्यायामाची कमतरता, अनुवंशिक दोष, बदललेली जीवनशैली अशी अनेक कारणे आहेत. अनेक नागरिक दुपारी जेवणानंतर सुशेगाद गाढ झोपतात. ही दुपारची झोप आरोग्यासाठी घातक आहे. मधुमेही रुग्णांसाठी तर ती अधिकच घातक असल्याने दुपारी झोपणे टाळावे, असे आयुर्वेदिक वैद्य डॉ. सुप्रिया प्रभुदेसाई धोंड यांनी सांगितले.
आयुर्वेदात केवळ उन्हाळ्यात कमी जेवण करून दुपारी झोप घेण्यास सांगितले आहे. जेवण आणि झोपेत किमान तीन तासांचा फरक असणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचा परिणाम पचनक्रियेवर होतो. पचनक्रिया आणि मधुमेहाचा जवळचा संबंध आहे. आपण खाल्लेल्या अन्नाचे योग्य तऱ्हेने पचन न झाल्यास त्याचा दीर्घकालीन परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. रात्रीच्या वेळी वारंवार लघवीला होणे, हे मधुमेहाचे प्राथमिक लक्षण आहे.
अनेकजण आरोग्यासाठी उत्तम म्हणून फळ आणि दूध एकत्र करून शेक तयार करून त्याचे सेवन करतात; परंतु ते आरोग्यासाठी योग्य नाही. फळे आणि दूध एकत्र घेतल्यास तो विरुद्ध आहार बनतो. आजकाल मांसाहारी जेवणानंतर आइस्क्रीम खाण्याचा ट्रेंड आला आहे; परंतु मांसाहारानंतर दुधाच्या पदार्थांचेही सेवन करू नये त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. मधुमेह झाल्यावर काहीजण गुळाचे सेवन करतात. गूळदेखील घातक आहे. मधुमेह असणाऱ्या व्यक्तीला जर गोड खावेसे वाटत असेल तर शुद्ध मधाचे सेवन करावे. त्यासोबत जांभूळ, तेंडल्याची भाजी अतिशय उत्तम असते त्याचे सेवन करावे, असे डॉ. सुप्रिया प्रभुदेसाई धोंड त्यांनी सांगितले.
जर आपल्याला सुदृढ आणि निरोगी जीवन जगायचे असेल तर व्यायामाशिवाय गत्यंतर नाही. व्यायामाची कमतरता असल्याने अनेक समस्या निर्माण होतात. आपण जे अन्न खातो त्या कॅलरीज जाळण्यासाठी व्यायाम, योगासने आणि प्राणायाम करणे गरजेचे आहे. मधुमेहासाठी उष्ट्रासन, अर्धउष्ट्रासन, त्रिकोणासन, वक्रासन लाभदायी ठरतात. ज्या व्यक्तींना अतिचिंता किंवा ताणामुळे मधुमेह होतो, त्यांनी प्राणायामामध्ये भ्रामरी प्राणायाम तसेच धार्मिक कार्ये जसे की भगवद्गीता वाचणे इतर धर्मियांनी आपापल्या धर्माचे वाचन, पठण, मनन करणे लाभदायी ठरते तसेच आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे सत्त्ववजय चिकित्सेचा अवलंब केल्यासही त्याचा लाभ होतो, असे डॉ. सुप्रिया प्रभुदेसाई धोंड यांनी सांगितले.
अनेकांचा समज आहे की आयुर्वेदिक औषधे घेतल्याने त्याचे आरोग्यावर काही विपरित परिणाम होत नाहीत; परंतु हा समज चुकीचा आहे. त्यामुळे नागरिकांनी आयुर्वेदिक औषधे घेताना वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत. आयुर्वेदिक उपचाराने नव्याने मधुमेह सापडला आहे, अशांवर पूर्णतः उपचार करता येतात; परंतु ज्यांना इन्सुलीन सुरू आहे, त्यांच्या बाबतीत मर्यादा येतात. अशा रुग्णांनी इतर उपचारांसोबत वैद्याच्या सल्ल्यानुसार आयुर्वेदिक उपचार घ्यावेत. आयुर्वेदात मधुमेही रुग्णांची पहिल्यांदा पचनक्रिया सुधारली जाते व नंतर उपचार केले जातात. गुळवेलीची गोळी, आवळा, हळदीचे सेवन मधुमेह रुग्णांसाठी चांगले असते तसेच इतरही उपचार केले जातात. त्यासाठी वैद्यांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करता येतात, असे डॉ. सुप्रिया प्रभुदेसाई धोंड यांनी सांगितले.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे किंवा असंतुलीत होणे म्हणजेच मधुमेह. हा आजार झालेल्या व्यक्तीच्या शरीरात इन्सुलिन निर्माण होण्याची प्रक्रिया बंद होतो किंवा थांबते. शरीरात आवश्यक प्रमाणात इन्सुलिन प्रमाण निर्माण न झाल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते आणि मधुमेहाची सुरुवात होते.
टाइप १ मधुमेह : हा आजार लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. रुग्णामध्ये इन्सुलीन फारच कमी किंवा तयार होत नाही. अशा रुग्णांना रक्तातील ग्लुकोजची पातळी संतुलित ठेवण्यासाठी नियमित इन्सुलीनचा डोस द्यावा लागतो.
टाइप-२ मधुमेह: एकूण रुग्णांपैकी ९०% रुग्णांना याचा त्रास होतो. अशा रुग्णांमध्ये शरीर इन्सुलीनचा योग्य वापर करू शकत नाही. तोंडावाटे औषधांसह इन्सुलीनच्या मदतीने ते नियंत्रित केले जाऊ शकते.
इन्सुलीनचे असंतुलन आणि ‘ड’ जीवनसत्वाचा परिणाम, कमी प्रमाणात व्यायाम करणे आणि अतिस्थूलता, उच्च रक्तदाब, खूप वेळ बसून राहणं, ताणतणाव, अनुवंशिकता ही मधुमेहाची कारणे असू शकतात.
संयुक्त राष्ट्रसंघाने २००६ साली जागतिक मधुमेह दिन म्हणून मान्यता दिली. दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी सर फ्रेडरिक बंटिंग यांच्या जन्मदिनी मधुमेह दिवस साजरा केला जातो. सर फ्रेडरिक बंटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी १९२२ मध्ये इन्सुलिनचा शोध लावला होता, पुढे याच इन्सुलिनवापर करून मधुमेहावर उपचार करण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.