गोव्यातील एका गरोवणीकाराची कैफियत

Goa Tourism: देवाने गोव्याला निसर्गाचे देणे भरभरून दिले आहे.
Goa|Tourist
Goa|TouristDainik Gomantak

-सावळो पालयेंकर

देवाने गोव्याला निसर्गाचे देणे भरभरून दिले आहे. नद्या, दर्या, डोंगर यांना आम्ही त्यांच्या नैसर्गिक स्वरुपातच राखायला हवे. गोव्यात दोन मोठ्या नद्या आहेत. त्याशिवाय इतरही आहेत. पश्‍चिमेला तर अफाट समुद्र व त्याचे सुंदर किनारे. जिथे पाण्याची अशी संपन्नता आहे तिथे मासेमारी (Fishing) हा व्यवसायही असणारच. गोव्यात (Goa) तर शेकडो वर्षे हा व्यवसाय चालू आहे. एकेकाळी गोमंतकीय या व्‍यवसायावरच आपली उपजिविका चालवायचे.

जाळ्यात मासे पकडणारे असो वा माझ्यासारखा साधा गळ टाकणारा असो, इथल्या पाण्यात असणाऱ्या माशांवरच त्यांचा निर्वाह वा छंद चालायचा. वर्षाचे सर्व काळ हा व्यवसाय चालतो. त्यात आनंद असायचा. पण अलीकडच्या काळात हे चित्र बदलेले दिसते. पर्यटनामुळे (Tourism) गोवा जसा अधिक वेगाने विकासाच्या दिशेने धावू लागला, तसतसा या तथाकथित विकासाच्या बरोबरीने येणारा आधुनिकतेचा राक्षसही गोव्यात (Goa) पोहोचला.

गोमंतकीयांकडे पैसा आला. ठीक आहे. पण मासेमारीच्या व्‍यवसायाचा विचार करता त्यात भयकृत अशी आधुनिकताही आली आणि त्याचा परिणाम म्हणून मासेमारीचे प्रमाण अतिरिक्तपणे वाढले. जाळ्यांचे प्रकार आणि प्रमाण वाढले. मासेमारी करणाऱ्या बोटींचे प्रमाण वाढले. समुद्रात जाळे घालणारे, नद्या आणि खाजनांनी जाळे घालायला लागले. त्याचा परिणाम गळ घेऊन मासेमारी करणाऱ्यांवर आणि छंद म्हणून मासेमारी जोपासणाऱ्या साध्या मासेमाऱ्यांवर झाला.

त्यात भर म्हणून समुद्रात पर्यटकांना (Tourist) सफरीवर नेणाऱ्या बोटी आल्या. दर्या-नद्यांमध्ये कर्कश आवाज वाढले. ह्या बोटींमुळे समुद्राच्या पाण्यात तेलाची गळती होऊ लागली आणि त्याचा परिणाम त्या पाण्यातल्या माशांवर आणि अन्य जीवसृष्टीवर व्हायला लागला. त्याचे जिते-जागते उदाहरण म्हणजे नेरूल गांवच्या प्रसिध्द 'तिसऱ्या'! तिथल्या तिसऱ्या आता लुप्ततच झालेल्या आहेत. याचे कारण वरील गोष्टींमुळे पाण्यात वाढलेले प्रदुषण. आज या 'तिसऱ्या' नेरूलपासून चार-पाच किलोमीटर दूर असलेल्या वेरेंच्या खाडीत पोहोचल्या आहेत. याचाच अर्थ ह्या वाढत्या प्रदुषणामुळे आणि अति मासेमारीमुळे इथल्या पाण्यातल्या मत्स्यसंपत्तीवर गंडातर आले आहे. माशांच्या अनेक प्रजाती नाहीशा झाल्या आहेत व बऱ्याचशा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

Goa|Tourist
गोमंतकीय कवी 'माधव सटवाणी' ठरले कालिदास पुरस्काराचे मानकरी

आता ह्यावर उपाय काय असू शकतो? एक उपाय म्हणजे परंपरा आणि आधुनिकता यांचे योग्य संतुलन राखणे. आवश्‍यकतेनुसार मासेमारी करणे. पैसे मिळतात म्हणून सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीलाच मारावे यात कुठला आहे शहाणपणा? आम्ही आताच सावध नाही झालो तर हा समुद्र, ह्या नद्या, इथली खाजने आपली संपत्ती आम्हाला देणे बंद करतील. मग काय होईल? अजून वेळ गेलेली नाही. माझ्यासारखे गळ घालून मासेमारी करणारे ह्याच आशेवर आहेत की कधी माणसाला अक्कल येईल आणि तो आपली चूक सुधारेल. तसे जेव्हा घडेल तेव्हा माझ्यासारखा ‘गरोवणेकाराला’ आणि ‘गरोवणी’ ला पुन्हा सोन्याचे दिवस येतील. माणसाला चांगली बुद्धी लाभो हीच देवाकडे मागणी!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com