डाकिया डाक लाया.... खाकी वर्दीतला संदेशवाहक

एखादा पोस्टमन खरोखरच इतका आनंदी जीवन जगू शकतो का?
Postman
Postman Dainik Gomantak
Published on
Updated on

- उल्हास जोशी, वास्को

परवाच मी टीव्हीवर (TV) राजेश खन्नाचे पोस्टमनच्या वेशात सायकलवर फिरत फिरत पत्र वाटपाचे काम करताना ‘डाकिया डाक लाया....’ हे गाणं (Song) पाहात होतो. त्यात तो आनंदी चेहऱ्याने आपले काम करताना दिसत होता. सहजच विचार आला, एखादा पोस्टमन खरोखरच इतका आनंदी जीवन जगू शकतो का? अर्थातच आहे त्यात सुख मानणारी माणसं आनंदी असतात हे मला माहीत आहे, तरीही मी आमच्या वास्को पोस्ट-ऑफिसमध्ये जाऊन तिथले पोस्टमन (Postman) विजय गणपुले यांची भेट घेतली व त्यांनाच विचारलं, "गणपुले साहेब , तुम्ही पोस्टमन असूनही खरंच आनंदी आहात का….त्या  राजेश खन्नासारखे ?’’ ते हसले व क्षणभर विचार करून ते म्हणाले  " मी तो चित्रपट (Movie) पाहिला नाही, पण मी आता खरंच सुखी आहे. खासकरून आम्हाला सातवा वेतन आयोग लागल्यानंतर. "

त्यावर मी म्हणालो, " तुम्ही आता सुखी आहे म्हणता, म्हणजे पूर्वी तुम्ही या नोकरीत सुखी नव्हता तर !’’ त्यावर त्यांनीच मला उलट प्रश्न केला , "कसा असेन? पगार तुटपुंजा होता.  मॅट्रिक पास होताच मी सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला पण वशिला नव्हता. शिवाय आम्हा ब्राह्मणांना रिझर्वेशन कोटाही  नसतो. मग मला एक संधी मिळाली. वयाच्या अठ्ठाविशीत मी ग्रामीण डाक सेवक म्हणून बांबोळीला पोस्टाची नोकरी पत्करली. पार्ट टाइम  नोकरी.. पडेल ते काम करायचं. सकाळ-संध्याकाळी दोन अडीच तास. तुटपुंजा पगार पण पाच वर्षे ग्रामीण सेवक म्हणून काम केल्यावर डिपार्टमेंटची एक परीक्षा देऊन हवंतर क्लार्कही बनता येतं किंवा पोस्टमनची कायम नोकरी मिळते. पाच वर्ष चिकाटीने काम करून, कधीकधी अर्धपोटी राहून मी माझं कर्तव्य केलं व परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोस्टमन झालो.

Postman
रिकाम्या पोटी नारळ पाणी पिणे आरोग्यदायी

मी विचारलं, ‘असं म्हणतात, आता मोबाईल (Mobile) मॅसेजमुळे लोकांचं पत्र लिहिणे बंद झालं आहे, त्यामुळे पोस्टमनच काम कमी झालं आहे. खरं ना ? त्यांनी हसत हसतच उत्तर दिलं,  ‘लोकं म्हणतात त्यात अजिबात तथ्य नाही. उलट शहरी वस्ती वाढली, अनेक मजली इमारती झाल्या, सगळीचकडे जावं लागतं.’ मी म्हणालो "आता सरकारी नियमाप्रमाणे प्रत्येक इमारतीच्या तळमजल्यावर प्रत्येकाच्या नावाचे लेटर बॉक्स (Letter box) असतातच की. त्यात पत्रे टाकली की झाले. जिने चढून जायची आवश्यकताच नाही!"

“नाही साहेब, सगळीच पत्रे बॉक्समध्ये टाकता येत नाहीत. काहीजणांना नोकरीची कॉललेटर येतात, ती बॉक्समध्ये टाकून चालत नाही. कारण बरीच माणसे चार-चार दिवस बॉक्स उघडतच नाहीत. अशावेळी त्यांचं नुकसान होऊ शकतं. कॉललेटर वेळीच हातात पडलं, तर संबंधित व्यक्ती मुलाखतीला योग्य वेळी जाऊ शकते, म्हणून आम्ही बहुतेक सर्वच पोस्टमन गरज पडली तर चार चार मजले चढून जाऊन कॉललेटर त्यांच्या हातात देतो. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद पाहून मी तरी तृप्त होतो,  शिवाय आता आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट पोस्टामार्फतच पाठवावे व त्याची पोचपावती घ्यावी असा सरकारने फतवाच काढला आहे. त्यामुळे कितीही दमलो असलो तरी आम्हाला जिने चढून जावेच लागते.

कोर्टाची कागदपत्रे तर संबंधित व्यक्तीलाच द्यावी लागतात. मध्यंतरी आठ दहा वर्षे मोबाईलची बिलेही पोस्टाने पाठवत असत. दरदिवशी साठ-सत्तर बिले पोचवावी लागत. आता ती बिलं ऑनलाइन (Online) भरायची सोय झाली आहे ती गोष्ट वेगळी. आता तर बँकांची (Bank) चेकबुकही पोस्टातूनच पाठवली जातात व त्याची पोचपावती घ्यावी लागते. त्याशिवाय खात्याने आम्हाला मोबाईलही दिलाय त्यावर अनेक नोंदी कराव्या लागतात व खात्याला पाठवाव्या लागतात. वृद्ध नागरिकांच्या सोयीसाठी पोस्टाने मोबाईल बँकिंग सुरू झाले आहे. त्या पैशांची देवाण-घेवाण रोखीत करावी लागते, त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. हे काम जोखमीचे तर आहेच. ज्येष्ठ नागरिकांचे लाईफ सर्टिफिकेट पोस्टमननी देण्याची सोय पण केली आहे. हे सर्व ऐकल्यावर पोस्टमनची कामे कमी झाली आहेत हा गैरसमज दूर होणे स्वाभाविकच होतं. आपणच जास्त काम करतो, इतर माणूस फुकटचा पगार घेतात, हा दृष्टिकोन बदलला पाहिजे. नाही का?’’

माझ्या लहानपणी दिवाळीचा फराळ खासकरून पोस्टमनला दिला जायचा. त्याला पोस्त म्हणत, मी सहजच विचारलं आज काही पोस्त देण्याची प्रथा लोक पाळतात का? त्यावर गणपुले साहेबांनी हसत हसतच उत्तर दिलं, ‘अजूनही बरीच माणसे ती प्रथा दिवाळी अथवा ख्रिसमसला पाळतात.’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com