

उगवे : जैतीर-उगवे परिसरात रेती व्यवसायावरून झालेल्या गोळीबारामागे कायदेशीर तसेच शांततेच्या मार्गाने एखादा विषय सुटत नसेल तर काय करावे, असा प्रश्न निर्माण झाल्याची दबकी चर्चा परिसरातून कानावर पडत आहे. या प्रकारामुळे येथील समाजजीवन ढवळून निघाले आहे. इथे मौन सामाजिक आक्रंदन चालले आहे.
या घटनेविषयी खुलेपणे कोणीही बोलण्यास तयार नाही. अनेक वर्षांपूर्वी अशा बेकायदा रेती व्यवसायाविरोधात आवाज करणाऱ्या जबाबदार नागरिकाला बोलते केले. स्थानिक पातळीवर वाद नको म्हणून आपले नाव प्रसिद्ध करू नका, या अटीवर त्याने सांगितले, की या गोळीबार प्रकरणामुळे अनेक सामाजिक प्रश्नही निर्माण झाले आहेत. कोण जबाबदार या साऱ्या घटनांना असे उगवेवासीयांना वाटू लागले आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, तेरेखोल नदीच्या पोरस्कडे-कासुले या भागात अवैधरीत्या चाललेल्या बेसुमार रेती प्रकरणात मजुरांवर काळोख्या रात्री अंधाराचा फायदा घेऊन केलेल्या गोळीबारामुळे रेती उपसा प्रकरणाला भयावह असे वळण लागलेले आहे.
सुरवातीच्या काळात साधेसोपे वाटणारे विशेषत: गावगजालीपुरतेच मर्यादित असलेले रेती उपसा प्रकरण हाताबाहेर गेल्याचे निदर्शनास येत आहे. मजुरांच्या आपापसांतील हेवेदाव्यांमुळे, गटबाजीमुळे, व्यवसायातील अंतर्गत चढाओढीमुळे त्या लोकांनीच हा गोळीबार केला असावा,
असे वाटत असताना या प्रकरणाला भयानक अशी आडवळणं फुटू लागली आहेत. सध्या तरी पोलिसांनी केवळ संशयावरून पाच स्थानिक युवकांना अटक केली असली तरी हा विषय एकंदरीत चिंतेचा होऊन बसला आहे.
अमर्याद रेती उपशामुळे आतापर्यंत तेरेखोल नदीच्या पात्राचे, नदीकाठच्या शेतीचे तसेच झाडापेडांचे अतोनात नुकसान झाले आहे. इथले समाजजीवन तसेच पर्यावरण ढवळून निघाले आहे.
१९९२ सालापासून या परिसरात रेती व्यवसाय सुरू आहे. अर्थातच त्याचे स्वरूप पारंपरिक रेती व्यवसायापुरतेच मर्यादित होते. स्थानिकांच्या गरजेनुसार एक-दोन होड्यांतून रेती काढली जात असे. त्याची विशेष झळ नदीच्या पात्राला, आजूबाजूच्या झाडापेडांना आणि शेतीलाही लागत नसे. तरीही रेती व्यवसायाची व्याप्ती भविष्यात वाढेल, या विचारापोटीच याला स्थानिक पातळीवर वैयक्तिक स्वरूपात विरोध व्हायचा.
ग्रामपंचायतींच्या सभेत एखादा ठराव मांडणे, संबंधित खात्यांना तसेच स्थानिक आमदारांना, मंत्र्यांना तक्रार, विनंती अर्ज सादर करणे अशा मर्यादित स्वरूपाचे प्रयत्न केले जायचे. या तक्रारीची ग्रामपंचायतींनी, संबंधित खात्यांनी तसेच मंत्री-आमदार महाशयांनी गंभीरपणे दखल घेतली नाही. ही वस्तुस्थिती आहे.
नाही म्हणायला खाण संचालनालयातर्फे यावर तात्पुरते उपाय केले; पण ते वरवरचे तोंडदेखलेपणाचे. पणजीहून संबंधित खात्याची अधिकारी माणसे पडताळणी करायला यायची; पण नेमक्या त्या दिवशी त्याच वेळेला होड्या आडोशाला उभ्या केल्या जायच्या.
अधिकाऱ्यांची पाठ वळली की ‘ये रे माझ्या मागल्या’ अशारीतीने परत रेती काढली जायची. रेती व्यवसायात स्थानिक लोक गुंतल्यामुळे आमदार-मंत्र्यांनीही यी प्रकारांकडे जाणूनबूजन दुर्लक्ष केले. यातही त्यांचे राजकीय हितसंबंध गुंतलेले आहेत.
संबंधितांची ‘रोख-थारावणी’ केल्याचे प्रकारही यापूर्वीही घडलेले आहेत. कुणी वैयक्तिक स्वरूपात प्रयत्न केलेच तर त्याचीही विशेष दखल घेतली जात नाही. ‘गोमन्तक’ने या प्रकरणाला वेळोवेळी वाचा फोडलेली आहे.
या भागात सध्या रेती व्यवसायावर बंदी असली तरी रात्रीच्या वेळी रेतीउपशाचे खेळ सुरू होते. रेतीउपशाचे कोणतेही पुरावे मागे न ठेवता रेती नियोजित स्थळी ट्रकने वा टेम्पोने पाठवण्याच्या घटनाही घडल्या आहेत. यासाठी बिहार, उत्तरप्रदेश प्रांतातून आणलेल्या मजुरांची निवासाची सोय रेती व्यावसायिकांकडून केलेली आहे.
सध्या बांधकामांना ऊत आल्यामुळे रेतीला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे रेतीचे दरही गगनाला भिडलेले आहेत. या अवैध रेती व्यवसायाची झळ स्थानिकांना बसत आहे. आतापर्यंत त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झालेले आहे. या नुकसानीची व्याप्ती प्रचंड आहे, समाजमन बधिर व सुन्न करणारी आहे.
१ याविरोधात स्थानिकांनी वेळोवेळी संघर्ष केलेला आहे. शांततेच्या मार्गाने मोर्चे काढून संबंधितांचे लक्ष वेधून घेण्याचे प्रयत्न केले आहेत. रेती व्यवसायामुळे आपला गाव तेरेखोल नदीत बुडतोय, नदीकाठची झाडंपेडं नदीत कोसळताहेत.
२ तेरेखोल नदीचे पात्र दिवसेंदिवस रुंदावत चालले आहे. वाडवडिलांनी तेरेखोल नदीच्या जीवावरच पिढ्यन्पिढ्या जतन करून ठेवलेली कृषिसंस्कृती डोळ्यांदेखत नदीच्या पाण्यात विसर्जित होताना बघावे लागत आहे. हे खूप त्रासदायक आहे.
३ सध्यातरी तेरेखोल नदी येथील स्थानिकांच्या वायंगणी शेतात येण्याच्या मार्गावर आहे. केवळ नैराश्यापोटीच मजुरांवर गोळीबार करण्याचा आततायी प्रकार युवकांच्या हातून घडला आहे. यातले सत्य पोलिस तपासातून समोर येणारच आहे.
जैतीर-उगवे येथे रेती व्यवसायातून झालेल्या गोळीबारानंतर पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीस सामोरे जावे लागत असल्यामुळे तसेच सध्यातरी काही महिने रेती व्यवसाय सुरू होण्याची शक्यता नसल्यामुळे रेती कामगारांनी आपापल्या गावचा रस्ता धरला आहे. त्यात तेरेखोल किनारी रेती काढण्यात येणाऱ्या केरी ते तोरसेपर्यंतच्या कामगारांचा समावेश आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तेरेखोल नदीत रेती काढण्यावर बंदी आहे असे असताना उगवेबरोबरच तेरेखोल नदीत अनेक ठिकाणी रात्री व पहाटे बेकायदेशीरपणे रेती काढण्याचे प्रकार सुरू होते. रेती काढण्यासाठी उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, आसाम, कर्नाटक आदी राज्यांच्या विविध भागातून हे मजूर येतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.