Sasashti News :
सासष्टी, प्रत्येक वस्तूंचा एकमेकांशी काहीना काही संबंध असतोच. त्याचप्रमाणे चित्र व कविता यांचाही एकमेकांशी संबंध आहे. चित्रकार आपल्या रंगातून जे सांगू इच्छितो, ते कविता सांगू शकते. जर रंगांची संगती व त्यातील आशय पाहिला तर त्यात काव्य व संगीत दिसू लागते.
शब्दांप्रमाणे रंगांतही वेगवेगळे अर्थ असतात, असे नामवंत व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी माधव बोरकर यांनी सांगितले.
‘बिम्ब’ प्रकाशन यांनी छापून प्रकाशित केलेल्या डॉ. सुनील काकोडकर यांच्या जलरंग चित्रांवर आधारित डॉ. नूतन देव यांच्या ‘चित्र काव्य’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन शनिवारी (ता. ८) मडगावात रवींद्र भवनात झाले. या प्रकाशन सोहळ्यात कवी माधव बोरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक याप्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. रवींद्र भवनच्या कृष्ण कक्षात ८ व ९ जून रोजी असे दोन दिवसीय डॉ. सुनील काकोडकर यांचे ‘मेडिसीन फॉर द सोल-२’ हे चित्रप्रदर्शन मांडण्यात आले आहे.
‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी सांगितले की, प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य चित्रकार व कवी-कवियत्रींच्या काव्यात असते. प्रत्येकाच्या घरात जसा देवाचा देव्हारा असतो, त्याचप्रमाणे एखादे पुस्तकांचे कपाट असावे. वाचन हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. वाचनामुळे बुद्धी व बुद्ध्यांक वाढतो.
याप्रसंगी डॉ. सुनील काकोडकर व डॉ. नूतन देव यांनीही मनोगत व्यक्त केले. ‘बिम्ब’ प्रकाशनाचे दिलीप बोरकर यांनी सांगितले की, ‘चित्र काव्य’ हा कवितासंग्रह म्हणजे चित्रकार व कवी यांची एकप्रकारे जुगलबंदी आहे. डॉ. काकोडकर यांच्या चित्रातील भाव ओळखून डॉ. देव यांनी कविता रचल्या. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अवनी नाईक यांनी केले.
नियंत्रण, एकाग्रता महत्त्वाची
जलरंग वापरणे अत्यंत कठीण असते. त्यासाठी योग्यप्रकारे रंगांचे मिश्रण, चित्रकलेसाठी वापरण्यात येणाऱ्या ब्रशवर आपले नियंत्रण व एकाग्रता ही अत्यंत महत्त्वाची असते. जेव्हा रंग व शब्दांचा संगम होत असतो, तेव्हा ‘चित्र काव्य’सारख्या पुस्तकाची निर्मिती होत असते, असे कवी माधव बोरकर यांनी सांगितले.
प्रत्येक गोमंतकीयाने स्वत:ला व्यक्त करणे आवश्यक आहे. पणजी स्मार्ट सिटी तसेच कला अकादमीच्या झालेल्या दुर्दशेबद्दल पणजीकर एक शब्दही काढत नाहीत. गोवा मुक्त होऊन ६३ वर्षे झाली तरी गोवा घडविण्याची प्रक्रिया संपलेली नाही. त्यासाठी गोव्याच्या जडणघडणीत प्रत्येक मूळ गोमंतकीयाने योगदान दिले पाहिजे.
पण गोमंतकीय लाचार, असाहाय्य झालेले चित्र पाहावयास मिळत आहे. गोमंतकीयांनी पेटून उठणे गरजेचे आहे, नाही तर पुढील दहा वर्षांत गोमंतकीयांवर अल्पसंख्याक म्हणून गोव्यात राहणाची वेळ येईल.
- राजू नायक, ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.