पणजी, ताळगाव पठार ते बांबोळी या रस्त्याच्या बाजूने असलेल्या पदपथावरील काही लाद्या फुटून गेल्या आहेत.
त्यामुळे तेथे खड्डे पडले असून ते सकाळ तसेच संध्याकाळच्यावेळी शतपावलीसाठी जाणाऱ्या पादचाऱ्यांना धोकादायक बनले आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून हे खड्डे पडलेले आहेत. पावसाळा सुरू झाला तरी त्यावरील या लाद्या घालण्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुर्लक्ष होत आहे. या खड्ड्यांमध्ये पाणी भरल्यास हे खड्डे न दिसल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या खड्ड्यांची वेळीच डागडुजी करण्याची गरज आहे.
या रस्त्याच्या दोन्ही बाजूने पदपथावर लाद्या टाकण्यात आल्या आहेत. काही दुरुस्तीच्या कामासाठी या लाद्या उखडण्यात आल्या होत्या. त्यातील काही ठिकाणी काम झाल्यानंतर त्या पुन्हा लावण्यात आल्या नाहीत.
पदपथालगतच्या फांद्याही अडचणीच्या
या पदपथाच्या बाजूने वाढलेल्या झाडांच्या फांद्याही अडचणीच्या होत आहेत. या पदपथावरून अनेक लोक सकाळी पहाटे व संध्याकाळच्यावेळी शतपावलीसाठी जातात. या रस्त्यावरून वाहने असतात, मात्र चालत जाणाऱ्या लोकांची वर्दळ नसते.
त्यामुळे या परिसरात पोलिस गस्तही आवश्यक असताना तेथे कधी सकाळी वा संध्याकाळच्या वेळी पोलिस दिसत नाहीत. हे क्षेत्र आगशी पोलिसांच्या अखत्यारित येत असल्याने पोलिसांची क्वचितच गस्त या भागात असते. त्यामुळे कोणताही अनुचित घटना होऊ नये यासाठी पोलिस गस्त ठेवण्यात यावी, अशी काही पदचाऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
अर्धा मीटर खोल खड्डे
या खड्ड्यांची खोली अर्ध्या मीटरपेक्षा असल्याने एखादा पादचारी आतमध्ये पडल्यास त्याचा हातपाय फ्रॅक्चर झाल्याशिवाय राहणार नाही. सकाळी व संध्याकाळी गोवा विद्यापीठ तसेच सांताक्रुझ येथील काही वृद्ध या पदपथावरून शतपावलीसाठी जातात. अनेकदा चालताना या खड्ड्यांचा अंदाज न आल्यास त्यात पडून जखमी होऊ शकतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.