
Panaji Smart City Work Updates
तिसवाडी: गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले इमेजीन पणजी स्मार्ट प्रकल्पाचे पूर्ण होण्याएवजी दिवसेंदिवस वाढत चालल्याने हे कधी पूर्ण होणार याची प्रतीक्षा पणजीवासीयांना लागली आहे. परंतु कामासाठी बहुतांश रस्ते पुन्हा एकदा खोदले गेल्याने शहराचा ‘वॉर झोन’ झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
तीन वर्षांपूर्वी स्मार्ट सिटीचे काम सुरू झाले होते, तेव्हा लवकरच काम पूर्ण होईल अशी आश्वासने देण्यात आली होती, परंतु २०२५ उगवला तरी काम पूर्ण होण्याचे चिन्ह दिसत नाही. रस्ते पुन्हा एकदा खोदले गेल्याने लोकांची प्रचंड गैरसोय होते. गेल्या काही वर्षात पणजीतील रहिवासी सभोवतीच्या परिसरात स्थायिक झाले, कारण धुळीमुळे त्यांना श्वसन समस्या आणि संबंधित आजार झाले. कामाचा फटका शहरातील व्यावसायिकांना देखील बसल्याने अनेकांना नुकसानाला सामोरे जावे लागले आहे.
स्मार्ट सिटीचे काम नियोजित पद्धतीने पूर्ण होण्याऐवजी वाढत असल्याने विविध सरकारी खात्यांत समन्वय होत नसल्याची नाराजी लोकांकडून व्यक्त केली जात आहे. प्रकल्पाच्या नावाप्रमाणे काम स्मार्ट होणे अपेक्षित होते, परंतु येथे उलटपणे होत असल्याचे उत्तम उदाहरण दिसते. निश्चित केलेल्या मुदतीत काम पूर्ण होणार याची आशा लोकांना होती, त्यासाठी त्रास सहन करून लोक रहात होते. पण वारंवार चाललेले खोदकाम त्रासदायक ठरत आहे.
स्मार्ट सिटीचे काम करताना योग्य तंत्रज्ञानाचा वापर न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सांडपाणी वाहिनीचे काम करताना प्रीकास्ट चेंबर वापरण्याची आवश्यकता होती, परंतु दीर्घ प्रक्रिया करण्याचा मार्ग स्वीकारल्याने हा परिणाम झाला आहे. हा प्रकार अनियोजित पद्धतीने केल्याचे स्पष्ट आहे.
कर्नल मिलिंद प्रभू, तज्ज्ञ
पणजीत आम्ही मनमानी कारभार करणार,अशी मानसिकता झाल्याची दिसते. नगरसेवक हे कठपुतळी झाले असून मनपा आयुक्त फोल ठरले आहेत. न्यायालयात जाऊन सर्रासपणे खोटे बोलण्याचे सत्र सुरू असल्याने कधी हे थांबणार हे हाच मोठा प्रश्न आहे.
एल्विस गोम्स, नेते काँग्रेस
पणजीत एकाच ठिकाणी रस्ता अनेकदा खोदला गेल्याने हे काम योग्य पद्धतीने होत नसल्याचे उघड झाले. एका टप्प्यात काम केले असते तर सहकार्य करण्याची तयारी लोकांनी केली होती. याचे उदाहरण पर्वरीतील होत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाने सिद्ध झाल्याने, आमदार आणि महापौर पिता – पुत्र जबाबदारी कधी घेणार आहेत.
- उत्पल पर्रीकर, नेते
स्मार्ट सिटीचे काम स्मार्टपणे केले जात नसल्याचे सिद्ध झाले असून कर दात्यांच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. अभियंत्यांच्या देखरेखीत हे काम केले जात नाही. त्यात मुख्यमंत्री ९० टक्के काम झाल्याचे विधान करून गेले. परंतु न्यायमूर्तींनी स्वेच्छा दखल घेऊनही काम पूर्ण झाले नसून या सगळ्यासाठी जबाबदार कोण हे निश्चित होणे आवश्यक आहे.
महेश म्हांब्रे, रहिवासी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.