
पणजी: गोवा हा किनाऱ्यालगतचा प्रदेश आहे. एकेकाळी घनदाट वनराईने नटलेल्या या प्रदेशात आता शहरीकरणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. हवा प्रदूषण, वाढते तापमान, आर्द्रता तसेच क्रॉंक्रिटीकरणाचा राज्याला जबर फटका बसला आहे, असे फॉरेस्ट हिरो ऑर्गनायझेशनचे डॉ. आर.के. नायर यांनी सांगितले.
‘द ग्रीन हिरो ऑफ इंडिया’ अशी ओळख असलेल्या डॉ. आर.के. नायर यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपाच्या ६ एकर परिसरात सुमारे ५१ हजारा विविध प्रजातीच्या झाडांची लागवड ‘मियावाकी’ पद्धतीने केली आहे. यासाठी वन विभागाकडून स्थानिक प्रजातीच्या झाडांची निवड करून घेत मान्यता घेतली आहे. या जंगलाच्या माध्यमातून वार्षिक १२ लाख ५० हजार किलो कार्बन संपुष्टात येईल. त्यासोबतच ५१ लाख किलोपेक्षा अधिक ऑक्सिजन या वनातील झाडे देतील, त्यामुळे मोपावर जरी प्रवाशांची वर्दळ वाढली किंवा वाहने आली तरीदेखील स्वच्छ प्राणवायू देणारा हा परिसर ठरणार आहे.
गोव्यातील पणजी, म्हापसा, मडगाव, वास्को आदी शहरांमध्ये राहणे आता कठीण होत आहे. राज्यात कमाल तापमानाचा पारा ३९ अंशांपर्यंत गेला होता. तर आर्द्रता कित्येकदा ९०%च्या वर जाते. शहरांमध्ये वाढती लोकसंख्या, प्रदूषणाच्या माध्यमातून स्वच्छ हवा मिळणे कठीण होत असून त्यासाठी शहरांच्या मध्यात तसेच मोकळ्या जागांमध्ये ‘मिनी फॉरेस्ट मियावाकी’ पद्धतीने वन निर्माण करणे गरजेचे आहे. गुरुवारी राज्यात कमाल ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून या एप्रिलमध्ये दुसऱ्यांदा तापमानाने ३५ अंशाचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात किमान तापमान २५.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे जे सरासरी तापमानाच्या तुलनेत २.६ अंश सेल्सिअस अधिक आहे. आज ७५ टक्के इतकी कमाल आर्द्रता नोंदविली.
डॉ. आर.के. नायर यांना ‘ग्रीन हिरो ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी ‘मियावाकी’ पद्धतीचा अवलंब करून देशभरातील ८० शहरांमध्ये तसेच १२ राज्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने वने निर्माण केली आहेत. त्यांच्या या कार्यासाठी जागतिक मान्यता प्राप्त आहे.
सामान्य वनांच्या तुलनेत ‘मियावाकी’ पद्धतीने विकसित करण्यात येणाऱ्या वनांमधील झाडे अधिक वेगाने वाढतात. पारंपरिक पद्धतीने लावलेले झाड वाढण्यास लागणाऱ्या कालावधीपेक्षा अर्ध्या वेळात तेवढ्याच उंचीची झाडे ‘मियावाकी’ पद्धतीने वाढविता येतात. साधारणपणे दोन वर्षांत ही वने विकसित होतात. झाडांमधील अंतर कमी असल्यामुळे घनदाट वन तयार होते. तसेच आपल्याला हवी ती स्थानिक झाडे या पद्धतीतून वाढवता येतात.
‘मियावाकी’ या नावाने जलद वनीकरणाची जगप्रसिद्ध जपानी प्रणाली सध्या जगात सगळीकडे लोकप्रिय होताना दिसते.
अशा जंगलामुळे वातावरण बदलाचा प्रभावदेखील कमी होतो. तसेच उत्तम पाऊस पडण्यासही मोठी मदत होते.
वनात राहणाऱ्या प्राण्यांना अन्नसुरक्षा लाभते. विकासकामांसाठी लाकूड मिळते.
कमी वेळात, कमी पाण्यात, कमी काळजीत हे वन तयार करता येते.
शहरांच्या ठिकाणी अशाप्रकारे वने तयार करून स्वच्छ हवा खेळती ठेवण्यास मदत होते.
गोव्यातील शहरांमध्ये आता सर्वत्र कॉंक्रिटीकरण झालेले आहे. गोव्याची मूळ संस्कृती नष्ट होऊन व्यावसायिकतेला अधिक प्राधान्य दिले जात आहे. लोकवस्ती वाढत आहे. अशा काळात ‘मियावाकी वन’ पद्धतीचा अवलंब करत गोव्यातील शहरे स्वच्छ हवेला प्राधान्य देणारी करणे गरजेचे आहे. गोव्यातील अनेक शहरे ही समुद्रकिनाऱ्यालगत आहेत. या भागात खारे वारे वाहणे, माती वेगळी असते, पावसाचा परिणाम अधिक असतो त्यामुळे योग्य ती काळजी घेत येथे ‘मियावाकी’ पद्धतीने शहरांमध्ये वन निर्मिती करू शकतो. गोव्यातील सरकार इच्छुक असल्यास आम्ही निश्चितपणे मार्गदर्शन करण्यास तयार आहोत.
डॉ. आर.के. नायर (ग्रीन हिरो ऑफ इंडिया), फॉरेस्ट हिरो ऑर्गनायझेशन
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.