योगेश मिराशी
म्हापसा, अलीकडे चोऱ्या, घरफोड्या, सोनसाखळी पळविणे, दुचाकी, मोबाईलची चोरी अशा घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने एकप्रकारे पोलिसही हतबल झालेत. वाढत्या चोऱ्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून सुजाण नागरिक या नात्याने दक्ष राहण्याची आता प्रत्येकाची जबाबदारी आहे.
पोलिसही आपल्यापरीने गस्त व इतर कर्तव्य बजावतात. चोऱ्या, घरफोड्या रोखण्याचे काम पोलिसांचे असले तरीही दरवेळी पोलिसांना दोष देण्यापेक्षा स्वतःच्या परीने काही खबरदारी घेतल्यास चोऱ्यांवर अकुंश ठेवता येऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन केल्यास याचा फायदा स्वतःसह समाजालाही होईल.
सध्या सोनसाखळी हिसकावून नेणे, घरफोड्या करणे किंवा मंदिरांतील फंडपेट्या लक्ष्य करण्याचे प्रमाण बरेच वाढले आहेत. अशावेळी शहरात तसेच गल्लीत रात्रीच्या वेळी गस्त घालणे पोलिसांचे कर्तव्य असते. त्याप्रमाणेच सुजाण नागरिक या नात्याने आपल्यालाही काही खबरदारी घ्यावीच लागेल. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सदनिका किंवा घरे बंद करून अनेकजण परगावी जातात. अशावेळी विशेष खरबरदारी घेतल्यास चोरांपासून आपण स्वतःचे तसेच समाजाचे संरक्षण करू शकतो.
मुळात कोणतीही मोठी चोरी करण्याआधी संबंधित घरांची किंवा सदनिकांची चोरट्यांकडून भरदिवसा रेकी (पाहणी) केली जाते. त्यामुळे आपल्या कॉलनीत किंवा गल्लीत येणारे फेरीवाले यांच्याकडे पोलिस कार्ड आहे का? याची सुजाण नागरिक या नात्याने विचारणा करावी.
त्याचप्रमाणे आपल्या घरांना सेफ्टी डोअर किंवा लॉक बसविणे कधीही उत्तम. तसेच बाहेरगावी किंवा फिरायला जातेवेळी घरात रोख रक्कम किंवा मौल्यवान दागिने व वस्तू बँकेतील लॉकरमध्ये ठेवावेत; कारण चोरटे घरात घुसल्यानंतर आधी कपाट किंवा तिजोरी फोडतात. त्यामुळे मौल्यवान वस्तू सहज दिसतील अशाप्रकारे घरात न ठेवता, सुरक्षित जागी ठेवणे योग्य आहे. वेळोवेळी पोलिसांकडून या सूचना करूनदेखील अनेकदा लोक दीर्घकालीन सुट्ट्या किंवा परगावी जातेवेळी घरांमध्येच आपले मौल्यवान साहित्य ठेवून जातात.
परगावी जातेवेळी शेजाऱ्यांना कल्पना द्यावी.
परगावी जाताना घरात रोख रक्कम किंवा मौल्यवान दागिने ठेवू नयेत.
घराच्या दाराला सेफ्टी लॉक (सेट्रिंग लॉक) बसवावा.
खिडक्यांजवळ मोबाईल, पर्स ठेवू नये.
घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
सदनिका, गल्लीत सामूहिक प्रयत्नांतून सीसीटीव्ही तसेच खासगी सुरक्षा रक्षक नेमावेत.
बाहेर जाताना किमान घराबाहेरील दिवा सुरू ठेवावा.
भाडेकरू पडताळणी करून पोलिसांना योग्य माहिती पुरवावी.
घरकाम करणाऱ्या व्यक्तीची योग्य ओळखपत्रे किंवा मोबाईल क्रमांक, पत्ता पडताळून छायाचित्र काढून ठेवावे.
अंधाराचा घेतात गैरफायदा
अनेकदा स्थानिक पालिका किंवा पंचायतींमार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसवतात. परंतु देखभालीअभावी ते निकामी किंवा नादुरुस्त होतात. त्यामुळे पंचायत व पालिकेने वेळोवेळी चौकातील किंवा मुख्य रहदारीच्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत की नाही, याची योग्य पडताळणी करावी.
तसेच सर्व मुख्य रस्त्यांवरील सार्वजनिक पथदीप हे पेटत आहेत की नाही याची खात्री केली पाहिजे. कारण अनेकदा अंधाराचा गैरफायदा घेत चोरटे चोऱ्यांचे धाडस करतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.