सासष्टी, लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी (ता. ७) दक्षिण आणि उत्तर गोवा या दोन मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. रविवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून प्रचारतोफा थंडावल्या.
गेल्या दीड महिन्यापासून आरोप-प्रत्यारोपाचा फडही रंगला. आता प्रत्यक्ष प्रचाराचा प्रभाव मतदारांवर कितपत पडतो, हे ४ जून रोजी मतमोजणीदिवशीच स्पष्ट होईल.
गेल्या दीड महिन्यापासून भाजप, कॉंग्रेस, रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांनी प्रचारावर भर देत वेगवेगळ्या विषयांवरून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. आज सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार कार्यकर्त्यांसमवेत मतदान केंद्र व बुथवरील कामांचा आढावा घेताना दिसले. यंदा राजकीय आखाड्यात सर्वच पक्षांनी ज्वलंत प्रश्र्नांवरून एकमेकांना घेरण्याचा प्रयत्न केला.
यावेळी भाजपच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोठे आकर्षण असल्याचे दिसून आले. ‘पल्लवी धेंपे आणि श्रीपाद नाईक यांना मत म्हणजे नरेंद्र मोदी यांना मत’, असे आवाहन भाजपने थेट जनतेला केले. गेल्या दहा वर्षांत भारतासह गोव्यात झालेला विकास, जगभरात भारताची उंचावलेली प्रतिमा यांवर भाजपने जास्त भर दिला. नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी तर गोव्यात सभा घेऊन जरी दोनच मतदारसंघ असले तरी ते गोव्याला ते किती महत्त्व देतात, हे दाखवून दिले.
भाजप सरकारने महिलांसाठी ३३ टक्के राजकीय आरक्षण जाहीर केले. कायदा लागू न होतासुद्धा त्यांनी गोव्यात एका महिलेला उमेदवारी देऊन गोव्यात महिलांसाठी ५० टक्के आरक्षणाचा पल्ला गाठला, हे प्रभावीपणे प्रचारावेळी सांगितले.
कोळसा, एसटी आरक्षणावरून टीकास्त्र
कॉंग्रेसने कोळसा वाहतूक, रेल्वेचे दुपदरीकरण, बेरोजगारी, दुहेरी नागरिकत्व, तसेच भाजप हा धर्मांध पक्ष आहे, हे सांगण्यावर भर दिला. एसटी समाज आरक्षणाचा मुद्दासुद्धा कॉंग्रेसने प्रखरपणे उपस्थित केला. कॉंग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी ‘संविधान गोमंतकीयांच्या माथी मारले’, हे वक्तव्य केले, ते केवळ गोव्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात गाजले. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणांमध्ये उल्लेख करून तो मुद्दा देशव्यापी केला.
भाजपने दुरावलेल्यांना प्रवाहात आणले :
भाजप नेत्यांनी लक्ष्मीकांत पार्सेकर, उत्पल पर्रीकर, मिलिंद नाईक, दीपक पाऊस्कर, इजिदोर फर्नांडिस, विजय पै खोत यांना मुख्य प्रवाहात आणले. कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आमदारांच्या मतदारसंघांमधील जे मूळ भाजप कार्यकर्ते दुखावले होते, त्यांनाही क्रियाशील केले.
रमाकांत खलपांचा भाजपवर पलटवार
दुसरीकडे, कॉंग्रेसचे लोकसभेचे उत्तर गोवा उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी म्हापसा अर्बन बँक डबघाईला येण्यास माजी मुख्यमंत्री (स्व.) मनोहर पर्रीकर हेही जबाबदार असल्याचे सांगत पलटवार केला. नंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही खलप यांच्यावर जोरदार टीका केली. म्हापसा अर्बन बँकेचा हा विषय गेली १५ दिवस सातत्याने गाजला.
पल्लवी धेंपे यांचे मॅरेथॉन दाैरे
पल्लवी धेंपे या मूलत: गर्भश्रीमंत. त्या सामान्य लोकांमध्ये मिसळू शकणार नाहीत. त्यांना गरिबांच्या व्यथा समजणार नाहीत, तर श्रीपाद नाईक यांनी उत्तर गोव्यात काहीच केलेले नाही, असे मुद्दे कॉंग्रेसने सुरवातीला मांडले.
पण भाजप नेत्यांनी त्यांना योग्यप्रकारे प्रत्युत्तर देऊन हे मुद्दे नगण्य ठरविले. दक्षिणेत पल्लवी धेंपे यांनी वीसही विधानसभा मतदारसंघांना तीनवेळा भेटी दिल्या. एकही दिवसाचा ब्रेक न घेता त्यांनी केलेला मॅरेथॉन दाैरा चर्चेचा ठरला. त्यांनी कार्यकर्ते आणि सामान्य लोकांमध्ये रमून विरोधकांचे मुद्देही खोडून काढले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.