थिवी, लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होऊन कित्येक दिवस लोटले, तरी भाजप व आरजी पक्षाव्यतिरिक्त अजून कुठल्याही पक्षाकडून आपले उमेदवार जाहीर केले नसल्याने मतदार संभ्रमात पडले आहेत.
उत्तर गोव्यात भाजपतर्फे श्रीपाद नाईक, तर आजीतर्फे मनोज परब यांनी आपल्या प्रचाराला सुरवात केली आहे. एवढे असूनही मतदारांच्या नजरा काँग्रेसच्या उमेदवारीकडे लागल्या आहेत.
श्रीपाद नाईक यांनी उत्तर गोव्यातून लोकसभा निवडणूक पाचवेळा जिंकून आत्तापर्यंत एक विक्रमच केला आहे. यावेळी पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांना सहाव्यांदा निवडणूक लढविण्याची संधी दिली आहे.
थिवी मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या अस्थिर मतदारसंघ. कारण, या मतदारसंघाने आजतागायत कुठल्याही राजकीय पक्षाला सलग विधानसभेच्या निवडणुकीत कौल दिलेला नाही. मात्र, या मतदरसंघाचे विद्यमान आमदार तथा मंत्री हे सलग दोनवेळा वेगवेगळ्या पक्षांच्या चिन्हांवर विधानसभेत निवडून आले आहेत.
थिवीचे लोकप्रतिनिधीत्व हे मंत्री नीळकंठ हळर्णकर (भाजप) यांच्याकडे असले तरी, या मतदारसंघावर आरजीची पकड तितकीच मजबूत दिसते. त्याचप्रमाणे माजी आमदार किरण कांदोळकर यांची भूमिका ही राजकीय समीकरणे बदलू शकतात.
गत विधानसभा निवडणुकीत ‘आरजी’चे उमेदवार मनोज परब यांनी ५०५१ मते मिळवली होती. म्हणजे जवळपास आरजीकडे मतांचा वाटा हा २१.११ टक्के आहे. हा टक्का यापुढे वाढूही शकतो. सध्या भाजपा व आरजी या दोन्ही राजकीय पक्षांनी थिवीत प्रचाराचा नारळ फोडला आहे, तर काँग्रेसने अजून उमेदवार जाहीर केलेला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील दहा वर्षांत केलेली कामे भाजपसाठी जमेची बाजू आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत भाजपला थिवीतून किमान सहा ते सात हजारांचे मताधिक्क्य मिळेल. सद्यस्थितीत काँग्रेसचे अस्तित्व कुठेच दिसत नाही. लोकांचा आम्हाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे सरशी आमचीच.
- नारायण डिचोलकर, भाजप कार्यकर्ते
कोण किती पाण्यात?
- किरण कांदोळकर यांची थिवीवर बऱ्यापैकी पकड आहे आणि ही मते लोकसभेत निर्णायक ठरू शकतात. ते येत्या लोकसभेवेळी कुठल्या राजकीय पक्षाच्या पाठिशी उभे राहतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
- सद्य:स्थितीत काँग्रेसचे थिवीमधील अस्तित्व किंबहुना सक्रियता संपल्यात जमा दिसते. पक्षाकडे कार्यकर्त्यांची कमतरता प्रकर्षाने जाणवते. दुसरीकडे, भाजप व आरजीकडे कार्यकर्त्यांची बऱ्यापैकी फौज आहे. अशावेळी कांदोळकरांनी काँग्रेसचा हात धरल्यास, ही उणीव भरून निघू शकते. परंतु काँग्रेसचा उमेदवार कोण, यावर बरेच काही अवलंबून असेल.
- एकीकडे रोजगाराच्या प्रश्नावर थिवीत लोकांमध्ये खदखद आहेच, परंतु केंद्रातील मोदी सरकारने घेतलेले काही ऐतिहासिक निर्णय भाजपसाठी जमेची बाजू आहे.
युती पक्षाच्या पाठिंब्याने आम्ही यावेळी थिवी मतदारसंघात आघाडी घेणार हे नक्की. आम्ही बऱ्यापैकी थिवीतमध्ये सक्रिय आहोत. लोकसभा निवडणुकीसंदर्भात आत्तापर्यंत आमच्या तीन बैठका कार्यकर्त्यांसोबत झाल्या आहेत. मुळात लोक भाजपला कंटाळले असून यावेळी बदल अपेक्षित आहे. निकला दिवशी ते स्पष्ट होईलच.
- वीरेंद्र शिरोडकर, काँग्रेस नेते
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.