Loksabha Election Voting
Loksabha Election VotingDainik Gomantak

Postal Voting : टपाली मतदान ठरणार निर्णायक; अटीतटीच्या लढतीमुळे दक्षिण गोव्यात भाजपला होणार साह्यभूत

Postal Voting : सेनादलातील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय वगळता इतरांची टपाली मते स्ट्रॉंगरुममध्ये सीलबंद केली आहेत. दक्षिण गोव्यात टपाली मतदान भाजपला विजयी होण्यास साह्यभूत ठरेल, अशी राजकीय चर्चा बाळसे धरू लागली आहे.

Postal Voting :

पणजी, उत्तर व दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघांत अटीतटीची लढत झाल्याचे राजकीय अंदाज वर्तविण्यात येऊ लागल्यानंतर आता सत्ताधारी तंबूचे सारे लक्ष टपाली मतदानाकडे लागून राहिले आहे. यात बहुतांश सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने ही मते सरकारच्या बाजूने पडतील, असे मानले जात आहे.

सेनादलातील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय वगळता इतरांची टपाली मते स्ट्रॉंगरुममध्ये सीलबंद केली आहेत. दक्षिण गोव्यात टपाली मतदान भाजपला विजयी होण्यास साह्यभूत ठरेल, अशी राजकीय चर्चा बाळसे धरू लागली आहे.

उत्तर गोव्यातून भाजपचे श्रीपाद नाईक आणि कॉंग्रेसचे ॲड. रमाकांत खलप तर दक्षिण गोव्यात कॉंग्रेसचे कॅप्टन विरियातो फर्नांडिस आणि भाजपच्या पल्लवी धेंपे यांच्यात खरी लढत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. सुरवातीला निवडणूक एकतर्फी होईल, असा अंदाज भाजपकडून अंतर्गतरित्या वर्तवला जात होता. कॉंग्रेसने उमेदवारी जाहीर करण्यासाठी घेतलेला वेळ भाजपच्या पथ्यावर पडेल, असे त्यांना वाटत होते.

उमेदवारी अर्ज सादर करण्यास चार दिवस राहिले असताना कॉंग्रेसने उमेदवारी जाहीर केली आणि त्यांच्या दोन्ही उमेदवारांनी मुसंडी मारली. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांत तुल्यबळ लढत झाल्याचे भाजप आणि कॉंग्रेसनेही मान्य केले आहे. दोन्ही बाजूंकडून विजयाचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्येकाची नजर ही टपाली मतदानावरच आहे.

राज्यात १२,४१६ टपाली मतदार आहेत. त्यापैकी ११,११५ जणांनी प्रत्यक्षात मतदान केले आहे. १,०१७ जणांकडून मतदान प्राप्त व्हायचे आहे. या मतांवर साऱ्यांची नजर आहे. विशेषतः दक्षिण गोव्यात अटीतटीची लढत असल्याने ५,६०४ टपाल मते कोणाला मिळतील, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

त्यापैकी ४,९९१ जणांनी मतदान केले असून ४५५ जणांच्या मतांची प्रतीक्षा आहे. उत्तर गोव्यात ६,८१२ टपाल मतदार आहेत, पैकी ६,१२४ जणांनी मतदान केले आहे. सेनादलाच्या १३३ मतदारांपैकी ७ जणांनी पोस्टाने मते पाठवली

आहेत.

दक्षिण गोव्यातील ५ हजार ६०४ मतदारांपैकी ४ हजार ९९१ जणांनी टपालाने मतदान केले आहे. सेनादलाच्या १६७ मतदारांपैकी ९ जणांनी पोस्टाने मते पाठवली आहेत.

Loksabha Election Voting
Cashew Fest Goa 2024: हुर्राक, फेणी, काजूचे पदार्थ, लाईव्ह म्युझिक आणि बरेच काही; शुक्रवारपासून गोव्यात काजू महोत्सव

हे मतदार ठरणार लक्षवेधी

१ २०२३ दिव्यांग मतदारांपैकी (जे मतदान केंद्रावर येऊ शकत नव्हते.) त्यापैकी ९७.२८ टक्के म्हणजे १,९६८ जणांनी मतदान केले आहे.

२ अत्यावश्यक सेवेतील २,२४१ पैकी २,१८९ म्‍हणजेच ९७.६७ जणांनी मतदान केले आहे.

३ निवडणूक सेवेतील १,७८३ जणांपैकी १,३५५ म्हणजेच ७५.९९ जणांनी मतदान केले आहे.

४ निवडणूक कामात मदत करणाऱ्या १८० पैकी १६७ म्हणजे ९२.७७ जणांनी मतदान केले आहे.

५ १,२३८ पोलिस व गृहरक्षक दल जवानांपैकी ९६७ म्हणजे ७८.१० जणांनी मतदान केले आहे.

३०० जणांना ईमेलद्वारे मतपत्रिका :

राज्याबाहेर असलेल्या ३०० जणांना ईमेलद्वारे मतपत्रिका पाठवली आहे. त्यातील १६ जणांनी मतदान करून मतपत्रिका टपालाने पाठवली आहे. इतरांकडून मतपत्रिका पोस्टाने येण्याची मुख्य मतदार अधिकारी कार्यालयाला प्रतीक्षा आहे. ८५ वर्षांवरील ४ हजार ६५१ जणांना मतपत्रिका कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी नेऊन दिली. त्यांनी मतदान करून कर्मचारी घेऊन गेलेल्या पेटीत ती मतपत्रिका टाकणे अपेक्षित होते. त्यापैकी ९५.७४ जणांनी म्हणजे ४ हजार ४५३ जणांनी मतदान केले आहे.

टपालाने मिळाली १६ मते

संयुक्त मुख्य मतदार अधिकारी त्रिवेणी वेळीप यांनी सांगितले, की जे टपाल मतदान प्राप्त झाले ते स्ट्रॉंगरुममध्ये पोचले आहे. सेनादलाचे कर्मचारी राज्याबाहेर आहेत. त्यांची मते मिळायची आहेत. ती मिळाल्यावर तीही सीलबंद करून स्ट्रॉंगरुममध्ये ठेवली जातील. दोन्ही जिल्ह्यांत मिळून साधारणतः ११ हजार टपाल मतदान असल्याने एकूण मतदानाच्या तुलनेत हा तसा छोटा भाग आहे. आजवर टपालाने १६ हून अधिक मते मिळाली आहेत.

...यामुळे सत्ताधाऱ्यांना आशा

सरकारने महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना वेळच्या वेळी दिला आहे, गृहकर्ज योजना पुन्हा सुरू केली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी सरकारच्या बाजूने ते मतदान करतील, असे भाजपला वाटते. याशिवाय पर्पल फेस्ताच्या निमित्ताने दिव्यांगांसाठी अनेक योजना मार्गी लावल्या, उपकरणांचे वाटप केले, त्यामुळे त्यांचीही मते भाजपने गृहित धरली आहेत. आयुष्मान भारत, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना यांमुळे ज्येष्ठ नागरिक आपल्या बाजूने टपालाचे मतदान करतील, असा भाजपचा होरा आहे.

सेनादल कर्मचाऱ्यांच्या मतांकडे लक्ष :

यंदा मतदानाच्या दिवशी कामावर असणारे, अन्य कामावर असल्याने मतदान करू न शकणारे, अशा मतदारांसाठी कर्मचारी प्रशिक्षण केंद्रे व तालुका पातळीवर मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली होती. त्या मतदान केंद्रांवर जाऊन या टपाल मतदारांनी मतदान केले आहे. याशिवाय ८५ वर्षांवरील मतदारांच्या घरी टपालपेटी नेऊन त्यांचे मतदान घेतले आहे. आता केवळ सेनादलातील कर्मचारी व कुटुंबीय यांना मतपत्रिका ईमेल केली असून तेच पोस्टाने आपली मते पाठवणार आहेत.

प्रत्यक्ष ‘टपाली मतदान’ बंद

: राज्याचे अतिरिक्त मुख्य मतदार अधिकारी सुनील मसुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी मतपत्रिका टपालाने (पोस्टाने) मतदाराच्या घरी पाठवली जायची. मतदार त्यावर मतदान करून ती मतपत्रिका पुन्हा पोस्टानेच परत पाठवत असे. त्यामुळे या मतदानाला ‘टपाली मतदान’ असे नाव पडले होते. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसानंतर हे मतदान होत असल्याने त्यावर काहीजण मतदारांना घरी भेट देऊन प्रभाव पाडतात, अशा तक्रारी आल्याने आता ती पद्धत बंद केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com