
पणजी: पर्यटनासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या गोव्यात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि हल्ले हा चिंतेचा विषय ठरला आहे. रस्ते असो वा किनारे, सगळीकडे अशा हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकही भयभीत झालेले आहेत. यावर्षी १ जानेवारीपासून आत्तापर्यंत राज्याच्या विविध समुद्रकिनाऱ्यांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ले केल्याच्या सात घटना घडल्या. त्यात २ देशी तर ५ विदेशी पर्यटक जखमी झाले.
२०२४ मध्ये किनाऱ्यांवर एकूण २२ व्यक्तींना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला, ज्यामध्ये ३ जीवरक्षकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे २१ मे २०२४ रोजी कळंगुट किनाऱ्यावर सर्वेश तांडेल, २२ मे रोजी बेताळबाटी किनाऱ्यावर रोशन पाटील तर मांद्रे किनाऱ्यावर ऑपरेशन्स मॅनेजर शशिकांत जाधव यांच्यावर तीन वेळा कुत्र्यांनी हल्ला केला. यामुळे किनाऱ्यांवर काम करणाऱ्या जीवरक्षकांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे.
‘दृष्टी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन अवस्थी यांनी सांगितले की, ‘मिशन रेबीज’ या संस्थेशी भागीदारी करून जीवरक्षकांना भटक्या कुत्र्यांच्या आक्रमक वर्तणुकीबाबत विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. ऑपरेशन्स मॅनेजर शशिकांत जाधव यांच्या मते, या प्रशिक्षणामुळे जीवरक्षकांना धोक्याची वेळ त्वरित समजेल व ते संरक्षणासाठी सज्ज बनतील.
केवळ समुद्रकिनारेच नव्हेत तर राज्यातील रस्त्यांवरही भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. २०२५च्या जानेवारी महिन्यात १७८९ हल्ल्यांची नोंद झाली आहे. म्हणजेच दररोज सरासरी ५७ जणांना भटक्या कुत्र्यांकडून चावे घेतले जात आहेत. केंद्रीय मंत्री एस. पी. सिंग बघेल यांनी दिलेल्या उत्तरानुसार, २०२२च्या जानेवारीपासून २०२५च्या जानेवारीपर्यंत एकूण ३८,९८६ भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांची नोंद झाली आहे.
लसीकरण आणि निर्बीजीकरणासाठी पंचायती, नगरपालिकांना प्रत्येक कुत्र्यामागे १८०० रुपये आर्थिक मदत मिळते. मात्र, त्यासाठी त्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आम्ही पूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाही पशुपालन संचालक डॉ. नितीन नाईक यांनी दिली.
दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची समस्या वाढत चालली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने पशुपालन विभागाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्या जागेवरून भटक्या कुत्र्यांना उचलले जाते, त्याच ठिकाणी त्यांना पुन्हा सोडणे बंधनकारक आहे. त्यामुळे आम्ही अधिक काही करू शकत नाही, असेही नाईक यांनी सांगितले.
सध्या कोलवा, वास्को आणि म्हापसा या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचे लसीकरण आणि शस्त्रक्रिया मोहीम सुरू आहे. जिथे भटके कुत्रे आढळतात, तिथे त्यांना पकडून त्यांचे लसीकरण केले जाते. मागील महिन्यापासून ही मोहीम सुरू झाली आहे. लवकरच राज्यातील इतर भागांतही त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे डॉ. नाईक म्हणाले.
भटक्या कुत्र्यांना एकदा उचलल्यावर त्यांचे संगोपन सरकारने करावे, जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही, असे काहींचे म्हणणे आहे. पशुपालन विभागातील अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या तरी भटक्या कुत्र्यांच्या संगोपनासाठी कोणतीही ठोस योजना नाही. तसेच, कुठलीही पंचायत किंवा नगरपालिकेकडून यासंदर्भात अधिकृत सूचना प्राप्त झालेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.