
पणजी: राज्यात उष्म्याचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यापासून बचावासाठी शहाळे, कलिंगड तसेच इतर फळांसह मोठ्या प्रमाणात लिंबू पाणी आणि शीतपेयांचे सेवन केले जात आहे. मात्र त्यामुळे सर्वांत छोटा लिंबू सर्वांत ‘मोठा’ भाव खाऊन जात आहे. दरम्यान, बाजारात रानमेवाही दाखल झाला असून, त्यास मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे.
मध्यम आकाराचा एक लिंबू १० रुपयांना १ तर ५० रुपयांना ६ या दराने विकले जात आहेत. लहान लिंबू ५० रुपयांना दहा या प्रमाणे विक्री केली जात आहे. परंतु या लिंबूमध्ये आवश्यक प्रमाणात रस नसल्याने मध्यम आकाराच्या लिंबांना अधिक मागणी वाढली आहे. लिंबाचे वाढते दर ऐन उकाड्यात सर्वसामान्यांना अधिक घाम फोडत आहेत.
पणजी बाजारात लहान आकाराचे एक कलिंगड १०० रुपये तर मध्यम आकाराचे एक कलिंगड १२० ते १५० रुपयांना विकले जात आहे. राज्यात हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने ४०० ते ५०० रुपये प्रतिडझन दराने तो विकला जातोय. तर, मानकुराद आंबे ८०० ते १००० रुपये प्रतिडझन दराने विकले जात आहेत.
राज्याच्या ग्रामीण भागात करवंदे, जांभूळ, जांभ, फणस, आंब्याचे पीक बहरात आहे. आता त्यांची मोठ्या प्रमाणात शहरी भागात आवक वाढली आहे. आंब्या, फणसाला मागणी आहेच, परंतु करवंद आणि जांभूळ हा रानमेवा अधिक भाव खात आहेत. जांभूळ हे आरोग्यासाठी खास करून मधुमेही रुग्णांसाठी लाभदायी असल्याने अनेकजण आवर्जून जांभळे खरेदी करत आहेत. करवंदे आणि जांभळांचा प्रतिवाटा ५० रुपये दराने विक्री होत आहे. सोबतच जांभ, फणसाचे गरे आदींना देखील चांगली मागणी आहे. एकंदरीत पणजी बाजारात रानमेव्याला मोठी मागणी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.