Goa Mhardol : कशी होणार 'जायांची जत्रा'? उदरनिर्वाह धोक्यात, म्हार्दोळच्या नाईक फुलकार समाजाला का सतावतेय चिंता?

म्हार्दोळ येथील प्रसिद्ध जाईच्या फुलांचे मळे अज्ञात व्यक्तिंकडून उधवस्त करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.
Dainik Gomantak
Dainik GomantakDainik Gomantak

Goa Mhardol : म्हार्दोळ हे गोव्यातील एक निसर्गसंपन्न गाव आहे. या गावातील प्रमुख दोन गोष्टी म्हणजे श्री महालसा नारायणी देवस्थान आणि सुवासिक जाईंची फुले. राज्यातील प्रसिद्ध अशी ‘जायांची जत्रा’ भरते ती इथेच. संपुर्ण परिसर दरवळून टाकणारी ही जत्रा इथला नाईक फुलकार समाज करतो.

देवी महालसेला संपुर्ण जाईंच्या फुलांनी सजवलेले वाहन ह्या नाईक फुलकार समाजातर्फे अर्पण केले जाते. विजयरथ, गरुडवाहन, मयूरवाहन यासारखी विविध मखरांची सजावट गेली १०० हून अधिक वर्षे मोठ्या भक्तिभावाने करतात.

Dainik Gomantak
Ironman 70.3 Goa: पुन्हा गोव्यात रंगणार आयर्नमॅनचा थरार! ट्रायथलॉन स्पर्धेची तारीख जाहीर

म्हार्दोळ गावात खूप प्रमाणात जाई च्या फुलांचे मळे आहेत. देवीच्या वाहन सजावटीसाठी हजारोंच्या संख्येने लागणारी फुले या मळ्यातून वेचली जातात. यांचा सुगंध राज्यात इतर कुठल्याही भागात सापडणाऱ्या जाईच्या फुलांपेक्षा वेगळा आणि उग्र असतो.

गावातील जवळपास ५० ते ६० परिवार ह्या जाईच्या मळ्यांवर उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मिळकतीचे हे एकमेव साधन आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये हा नाईक फुलकार समाज संकटात सापडला आहे. अज्ञात व्यक्तिंकडून त्यांच्या मळ्यांची नासधूस करण्याचे प्रकार वाढत असून सरकारदरबारी यांची कुणीच दखल घेताना दिसून येत नाही.

Dainik Gomantak
Goa Road Issue: खड्ड्यांतून शोधावा लागतो माेरजीवासीयांना रस्ता

एका जाईच्या रोपट्याची पूर्णपणे वाढ होऊन त्याला फूले यायला साधारण एक ते दीड वर्ष लागते. जर रोपट्याची वाढ चांगली झाली तर त्याला 70 ते 80 कळे येतात. त्यामागे त्या मळेवाल्याची मेहनत, वेळ सगळचं महत्वाचे असते असे फुलकार बांधव सांगतात.

सुरवातीला म्हार्दोळ गावात अनेक ठिकाणी फुलांचे मळे होते. पण कालांतराने गावातून बगलरस्ता काढल्याने काही मळे स्थलांतरित करण्यात आले. अगदी पिढ्यानपिढ्या जपून ठेवलेल्या ह्या मळ्यांवर आजही त्यांचा मालकीहक्क नाहीये. त्यामुळे काही बिल्डर लॉबी रस्त्यानजीक असलेल्या ह्या जमिनींवर नजर ठेवून आहेत.

जाईच्या मळ्यांना आग लावणे, केमिकलयुक्त पदार्थ घालून झाडे मारून टाकणे असे प्रकार गेल्या काही वर्षात सतत घडत आहेत. हे प्रकार कोण आणि कशासाठी चालू आहेत याचा अजून पत्ता लागला नाहीये. त्यामुळे नाईक फुलकार समाजाने याबाबत पंचयातमध्ये तक्रार नोंदवूनसुद्धा कसलीच दखल अजून घेतली गेली नाही.

सार्वजनिक बांधकाम खात्याची नोटिस देऊनसुद्धा रस्त्यालागत असलेले बेकायदेशीर सीमेंट ब्लॉक तयार करणारे परप्रांतीय तेथून हटायला तयार नाहीत. त्यामुळे जी उरलेली फुले आहेत ती त्यांच्या सीमेंटच्या धुळीमुळे कोमेजतात किंवा मरतात.

पिढ्यानपिढ्या नाईक फुलकार समाज जपत आलेले जाईच्या फुलांचे हे मळे आज संकटात आहेत. काही स्वार्थी लोकांमुळे या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. यांना वाली कोण? जर जाईची फुलेच नसतील तर प्रसिद्ध असणारी ‘जायांची जत्रा’ कशी होणार? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे हे फुलकार बांधव बघत आहेत.

निवडणुकीच्या वेळी सरकार फक्त आश्वासन देते. त्यानंतर आमच्याकडे कोणी ढुंकून देखील पहात नाही. आत्तापर्यंत झालेल्या एकही लोकप्रतिनिधीने आमची दखल घेतली नाही. म्हार्दोळची वैशिष्ट्यपूर्ण अशी जाईची फुले संपण्याचा मार्गावर आहे. ज्यावर आमचा उदरनिर्वाह आहे तोच आमच्यापासून हिरावून घेतला जातोय. यावर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे नाहीतर राज्यभरात प्रसिद्ध असलेली ‘जायांची जत्रा’ यापुढे होणे शक्य नाही.

रामचंद्र नाईक, म्हार्दोळ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com