
पणजी: राज्यातील नवे महामार्ग तसेच महामार्गांच्या दुरुस्तीसाठी केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षांत तब्बल २,३२० कोटींचा खर्च केला आहे. या खर्चातून केंद्राने राज्यातील ५३ किमी महामार्गांची कामे केली आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेतील लेखी प्रश्नाच्या उत्तरातून दिली आहे.
खासदार सदानंद शेट तानावडे यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षांत प्रत्येक राज्यामध्ये नवे महामार्ग तसेच महामार्गांच्या दुरुस्तीसाठी किती कोटी खर्च केले, त्यातून किती किमी लांबीच्या महामार्गांची कामे करण्यात आली, असे प्रश्न तानावडे यांनी विचारले होते.
या प्रश्नांच्या उत्तरातून मंत्री गडकरी यांनी सादर केलेल्या आकडेवारीतून, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गोव्यातील महामार्गांसंदर्भातील ८१८ कामे हाती घेतली. यातून ५३ किमी लांबीच्या महामार्गांची कामे करण्यात आली आणि त्यावर २,३२० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे दिसून येते.
देशभरातील जनतेला दर्जेदार महामार्ग देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय प्रयत्नशील आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या महामार्गांमध्ये दोष आढळल्यास त्याची पूर्ण जबाबदारी कंत्राटदारावर ठेवून त्याच्याकडून स्वखर्चाने पुन्हा दुरुस्ती करून घेण्यात येत आहे. काही प्रकरणांत कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाईही केली जात आहे, असेही मंत्री गडकरी यांनी उत्तरात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.