Mhadai River Rafting: भर पावसाळ्यात म्हादईचे पाणी आटले, सत्तरीवासीयांवर संकट

वॉटर राफ्टिंग बंद झाल्याने पर्यटकांची पाठ; शेतीवरही होणार परिणाम
Mhadai River
Mhadai RiverDainik Gomantak

Mhadai River Rafting: म्हादई ही बारमाही वाहणारी नदी. मात्र, भर पावसाळ्यात ऑगस्ट महिना सुरू असतानाच या नदीतील पाणी आटू लागल्याने भविष्यात सत्तरीवासीयांवरील मोठ्या संकटाची चाहूल लागली आहे. याचा परिणाम शेती-बागायतीवर होणार आहे. पाणी आटल्याने नदीतील वॉटर राफ्टिंगही बंद झाल्याने स्थानिकांचा पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे.

उस्ते, सावर्डे, धावे, नानोडा, बांबर, कुडशे आदी भागांतून म्हादई नदी वाहते. म्हादई नदीचे पाणी वळविण्यासाठी कर्नाटकने रचलेल्या कारस्थानाचा हा परिणाम तर नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. त्यातच घाटमाथ्यावर पावसाने पाठ फिरवली तर येणारे दिवस पाण्याविणा कसे काढायचे, असा प्रश्‍न सत्तरीवासीयांना पडला आहे.

दाबोस प्रकल्पावर गंडांतर

म्हादई नदीचे पाणी दाबोस पाणी प्रकल्पात शुद्ध करून सत्तरी तालुक्यातील ७० टक्के गावांना पुरवले जाते. मात्र, पाणीच आटले तर येणाऱ्या दिवसांत पाणीपुरवठा कसा होणार, हा मोठा प्रश्न आहे.

पावसाळ्यातील पाणी साठवून ठेवण्यासाठी कोणतीच उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागण्याची शक्यता आहे.

अभयारण्यातील जनावरांचे हाल

उस्ते, कुडशे, सावर्डे हा भाग म्हादई अभयारण्यात येत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात रानटी जनावरांचा वावर आहे. जर म्हादई नदीचे पाणी या जनावरांसाठी मिळाले नाही तर ती लोकवस्तीमध्ये येण्याची शक्यता आहे.

राज्य सरकार या गावांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याच्या विचारात आहे. जर म्हादई नदीत पाणीच नसेल, तर विकास कसा होणार, हा मोठा प्रश्न आहे. रानटी जनावरांसह जैविक संपदाही संकटात येणार आहे.

Mhadai River
Sunburn In Goa: ग्रामसभांत खाण, सनबर्नला विरोध, मुळगाव- आगरवाडा ग्रामसभा गाजल्या

‘यंदा सत्तरी भागात पाऊस कमी प्रमाणात पडला. त्यातच म्हादई नदीतील पाण्याची पातळी कमी होऊ लागली असून हे शेती-बागायतीसाठी मोठे संकट आहे. एरव्ही म्हादई नदी वर्षभर वाहत असते. मात्र, यंदा वेगळीच स्थिती आहे. आता निसर्गानेच काही चमत्कार घडविला, तर परिस्थिती बदलू शकते.

- अनिरुद्ध जोशी, शेतकरी.

Mhadai River
Bhoma Village: भाजपने गोमंतकीयांच्या घरावर वरवंटा फिरवण्याचा विडाच उचललाय, रस्त्याचे प्रयोजन न थांबवल्यास....

‘हवामान बदलामुळे पावसावरही परिणाम होत आहे. राज्यात पावसाचे प्रमाण पूर्णत्वास आले आहे. मात्र, म्हादई नदीतील पाण्याची पातळी घटत आहे. कारण मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड. जर जंगल सुरक्षित राहिले नाही तर पाण्याच्या पातळीवर नक्कीच परिणाम होईल. हे भविष्यातील मोठे संकटाचे आहे. त्यामुळे सर्वांनी जंगल सुरक्षित राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

- राजेंद्र केरकर, पर्यावरण अभ्यासक.

‘‘ वाॅटर राफ्टिंगला येणाऱ्या पर्यटकांसाठी आम्ही वाहन उपलब्ध केले होते. मात्र आता म्हादई नदीतील पाणी आटल्याने हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे. आता सर्वांना पावसाची प्रतीक्षा असून घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर पुन्हा हा व्यवसाय सुरू होईल.

- राजेंद्र अभ्यंकर, वाहन व्यावसायिक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com