
तिजारा: गोव्याचा समुद्र आणि येथील किनारपट्टी प्रदूषणग्रस्त बनल्याचे आम्ही गृहीत धरले असतानाच, आमच्या सुंदर राज्याचा सागर देशातील सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषित असल्याचा निष्कर्ष भारत सरकारनेच काढला आहे.
पर्यावरण व विज्ञान मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय किनारी संशोधन केंद्राने तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे, की किनारी राज्यांमध्ये गोव्यातील किनाऱ्यांवर आढळणाऱ्या प्लास्टिकचे प्रमाण ५३ टक्के असून तेथे बिगर प्लास्टिकचेही प्रमाण ४७ टक्के आहे, जे भीषण आहे.
गोव्याने प्लास्टिक कचऱ्यामध्ये तामीळनाडू आणि गुजरात (४७ टक्के), पश्चिम बंगाल (४६ टक्के), महाराष्ट्र (४२ टक्के) यांना मागे टाकले आहे.
अतिपर्यटन, मच्छीमारांची हलगर्जी, पातळ प्लास्टिकवर निर्बंध आणण्यात अपयश, उद्योग, शीतपेयांचा वाढता वापर ही सागरातील वाढत्या प्लास्टिक प्रमाणाचे कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. केंद्रीय विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने (सीएसई) येथील अनिल अग्रवाल संस्थेत पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या ‘सागरातील प्लास्टिकचे प्रदूषण’ या विषयावर अभ्यासवर्ग आयोजित केला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली.
समुद्र आणि किनारपट्टीचा एक किलोमीटर भूभाग यांचा अभ्यास केल्यानंतर समुद्र संशोधन संस्थेने हा निष्कर्ष काढला असून समुद्रातील प्लास्टिक प्रदूषणही अनेक मार्गांनी येथे येते. हे प्रदूषण मच्छीमार, उद्योग, टाकावू वस्तू, जहाजे आणि प्रशासनाने निर्बंध लागू करण्यात केलेली हयगय यांमधून होतेच, शिवाय सांडपाणी, गटार व्यवस्थेतून वाहून येते, तसेच नाले व ओहोळ यामधून वाहून आणले जाते.
राष्ट्रीय किनारी संशोधन केंद्राने गोव्यात सर्वाधिक किनारी प्लास्टिक प्रदूषण असल्याचा निष्कर्ष कसा काढला असे विचारता, ‘सीएसई’चे संशोधक सिद्धार्थ सिंग म्हणाले, ‘किनाऱ्यावर साचलेले प्लास्टिक गोळा करून त्याचे वजन करण्याची ही पद्धत आहे. किनाऱ्यावर साचलेला प्लास्टिक कचरा किती जागा व्यापते आणि त्याचे वजन काय, यावरून हे अनुमान काढले जाते.’
गोव्याच्या किनाऱ्यांवरील वाळूत प्लास्टिकच्या थैल्या व पाकिटे खोलवर रूजली असून ते स्वच्छ करणे, हे जिकिरीचे काम बनले आहे.
हे प्लास्टिक नंतर किनाऱ्यावर थांबत नाही, तर ते वाऱ्याने उडून किंवा पाण्यातून वाहत जाऊन समुद्रात पसरते. नंतर त्याचे तुकडे बनतात व ते मत्स्य जीवनाचे भक्ष्य बनते. जगात सध्या सूक्ष्म प्लास्टिकचे समुद्रातील प्रमाण हा गंभीर चिंतेचा विषय बनला असून मत्स्यखाद्याद्वारे ते मानवी शरीरात पसरले आहे.
सिद्धार्थ सिंग म्हणाले, मानवाची फुफ्फुसे, रक्ताच्या पेशी व गरोदर महिलांच्या गर्भातही सूक्ष्म प्लास्टिकचे प्रमाण सापडले आहे. मानवी मेंदूच्या पेशींमध्येही ते गेल्यामुळे संशोधक भयभीत झाले आहेत.
हा उभरता विषय असून सूक्ष्म प्लास्टिकचे कण मानवी शरीरात गेल्याने मानवी जीवनावर त्याचा काय परिणाम होतो, याचा अभ्यास अद्याप झालेला नाही.
देशात कचऱ्याचे प्रमाण वाढत चालले आहे, प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध आणणे राज्यांना शक्य झालेले नाही, तसेच प्लास्टिक बाटल्यांवर नियंत्रण आणणे सरकारे व प्रदूषण नियंत्रण मंडळांना अपयश आले आहे. जगात अनेक प्रगत राष्ट्रांनी प्लास्टिक वापरणाऱ्या खाद्यपदार्थांच्या, तसेच पेय कंपन्यांना त्यांनी बाजारात आणलेल्या प्लास्टिक बाटल्या परत मिळविण्याचे बंधन घातले आहे. ९५ टक्के प्लास्टिक गोळा न केल्यास त्यांना कठोर दंड ठोठावला जातो.
प्लास्टिक हे मानवासमोरचे गंभीर संकट असून प्लास्टिकची जाडी वाढविल्यामुळेही हे संकट कमी होत नाही. समुद्रात पोहोचून त्याचे तुकडे होतात, सूक्ष्म होत जातात व हे कण मानवी शरीराला अपाय निर्माण करत आहेत.
शास्त्रज्ञांच्या मते, गोव्याचे किनारे जे पर्यटकांसाठी महत्त्वाचे आहेत; परंतु प्लास्टिकचे ते कण मानवी जीवनाला धोकादायक बनले आहेत. त्यामुळे मत्स्यजीवनाची तपासणी करून प्लास्टिक कण व इतर प्रदूषित तत्त्वांचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.
शीतपेय कंपन्यांसाठी डिपॉझिट योजना
गोव्याचा दरडोई प्लास्टिक वापर देशात सर्वाधिक आहेत. याचे कारण दरवर्षी गोव्यात एक कोटीच्या संख्येने येणारे पर्यटक हेच आहे. त्यांनी किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात प्रदूषण केले आहे; परंतु आता गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकल्पनेनुसार शीतपेय कंपन्यांसाठी डिपॉझिट योजना सुरू केली आहे. त्यामुळे प्लास्टिक प्रदूषण ८० टक्क्यांनी कमी होईल, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूत्रांनी दिली.
गोव्यातील किनाऱ्यांवरील प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण मोजमाप करण्यासाठी २०१८ ते २०२३ हा काळ निवडण्यात आला. किनारपट्टी स्वच्छ करणाऱ्या संस्थांनी जमवलेल्या प्लास्टिकचे मोजमाप करून ५३ टक्के प्रमाण निर्धारित करण्यात आले आहे.
गोवा सरकार किनारपट्टीवरील प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी जरूर प्रयत्न करत आहे. सरकारने किनाऱ्यांच्या स्वच्छतेवर ४० कोटी खर्च केले आहेत; परंतु हा कचरा मानवी आरोग्यास विघातक असल्याने आणखी कडक उपायांची आवश्यकता आहे.
- अनिकेत शर्मा, वैज्ञानिक, सीएसई.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.